जगभरासह देशात दररोज पर्यावरणाच्या रक्षणावर चर्चा, आंदोलने होतात, आवाज उठवला जातो, पण तरीही परिस्थिती बदलेली पाहायला मिळत नाही. विघटन न होणाऱ्या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होत आहे. मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांचीही तीच स्थिती आहे. पण हिच परिस्थिती बदलण्यासाठी मुंबईत राहणाऱ्या सहेर भामलाने पुढाकार घेतला आहे. मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठी सहेर वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षापासून काम करत आहे.

“मी लहानपणापासूनच जॉगर्स पार्क, कार्टर रोड येथे खेळण्यासाठी येत होते. तेव्हापासून इथे मोठ्या प्रमाणात कचरा असल्याचे मी पाहत आले आहे. त्यावेळी मी लहान होते आणि मला याबदद्ल समज नव्हती. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्याच परिसरात कचरा आहे हे पाहून मला दुःख व्हायचे. पण मग हे आपणच साफ करणार नाही तर कोण करणार,” असे सहेर भामला म्हणते.

सहा वर्षापूर्वी सहेरने स्वच्छतेसाठी एक मोहिम उभी करण्याचे ठरवले. इको चॅम्प्स नावाच्या संघटनेसोबत सहेर समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता करण्याबरोबरच झाडे लावण्याचेही काम करते. पर्यावरण रक्षणाच्या या लढ्यात सहेरला तिचे वडील आशिष भामला यांचेही सहकार्य लाभले आहे. आशिष भामला हे पर्यावरणाशी संबंधित अनेक कार्यक्रमात सहभागी होतात. हळुहळू सहेरच्या या मोहिमेला यश येऊ लागले. सहेरच्या या प्रयत्नांनी आज जवळपास ९०० विद्यार्थी या मोहिमेसोबत जोडले गेले आहेत.

आपल्या रक्तामध्ये प्लास्टिक

“एकल वापरातील प्लास्टिक हे खूपच घातक आहे हे लोकांना पटवून देण्याचे माझे लक्ष आहे. जितके जास्त चमकणारे प्लास्टिक समुद्रात जाते तिथले जलचर त्यापासून आकर्षित होतात. मासे हे अन्न समजून खातात आणि आपला प्राण सोडतात. जे जिवंत राहतात त्यांना आपण खातो. त्यामुळे आपल्या शरीरात आणि रक्तातही प्लास्टिक आहे,” असे सहेर म्हणाली.

पर्यावरण आणि आपल्या शहराचा स्वच्छ ठेवण्यासाठी सहेरसोबत काश्मीरमध्ये १० वर्षाची जन्नत तारिकही काम करत आहे. गेल्या काही वर्षांपासून जन्नत तिचे वडील तारिक अहमद यांच्यासह दल सरोवरात पसरलेला प्लास्टिकचा कचरा साफ करण्यात गुंतलेली आहे. ही चिमुरडी दररोज आपल्या वडिलांच्या बोटीत बसून दल सरोवराच्या कोणत्या ना कोणत्या भागात जाऊन पर्यटक आणि स्थानिकांनी पसरवलेले प्लास्टिक बाहेर काढण्याचे काम करत आहे. जन्नतच्या असमान्य कामाचे पंतप्रधान मोदींनीही कौतुक केले आहे.

जन्नतचे काम पाहून मुंबईची सहेर भामलाही काश्मीरमध्ये पोहोचली होती. सहेरने जन्नतसोबत दल सरोवराच्या स्वच्छतेचे काम केले. तुम्ही तुमचा कचरा हा दल सरोवरात किंवा मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर न टाकता कचऱ्याच्या डब्यात टाकावा हीच आमची विनंती आहे, असे सहेर म्हणाली.

सहेर आणि जन्नतच्या प्रयत्नांनी हे सिद्ध केले आहे की यासाठी कोणीतरी सुरुवात करायला हवी. या दोघांच्या प्रयत्नांना कधीतर यश येऊन या मोहिमेला कधीतरी यश नक्कीच येईल.