Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी (२२ एप्रिल) झालेल्या हल्ल्यात हैदराबादमध्ये गुप्तचर विभागात काम करणाऱ्या मनीष रंजन यांची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली. मनीष रंजन हे मुळचे बिहारचे होते. पत्नी आणि दोन मुलांसह ते जम्मू आणि काश्मीरला फिरायला गेले होते. ज्यावेळी हल्ला झाला तेव्हा ते पहलगामच्या मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळख असलेल्या गवताळ कुरणाजवळ होते. तिथेच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर मनीष रंजन यांनी पत्नी आणि मुलांना विरुद्ध दिशेने पळण्यास सांगितले.
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात २६ निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांतील हा सर्वात मोठा भीषण असा हल्ला आहे. अनेकजण आपल्या कुटुंबासह याठिकाणी सहलीसाठी आले होते. तर काही नवविवाहित जोडपेही याठिकाणी फिरायला आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी लोकांना वेगळे करून त्यांचे धर्म विचारून गोळ्या घातल्या.
मनीष रंजन यांच्या हत्येनंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जम्मू आणि काश्मीरच्या हल्ल्यासंदर्भात दुःख व्यक्त केले. “या भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. असे हल्ले आम्ही भारतीयांच्या आत्म्याला धक्के देऊ शकणार नाहीत. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की, या हल्ल्याच्या पाठी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी”, अशी प्रतिक्रिया रेवंत रेड्डी यांनी दिली.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीही या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो. ज्या कुटुंबांनी आपल्या जवळ्या लोकांना गमावले त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो.”