करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नागरी विमान वाहतूक विभागाने घेतला. नागरी विमान वाहतूक विभागाच्या महासंचालकांनी बुधवारी यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे, आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याची मुदत वाढवण्यात आली असून २८ फेब्रुवारीपर्यंत ही विमानसेवा बंद राहील. हा निर्णय आंतरराष्ट्रीय व्यापारी विमानसेवांना आणि नागरी विमान वाहतूक विभागाने मान्यता दिलेल्या विशेष विमानांसाठी लागू नसेल. करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च २०२० रोजी भारताने सर्व आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक सेवा बंद ठेवली होती. त्यानंतर जुलै २०२० मध्ये ४० देशांशी ‘एअर बबल’ व्यवस्था करून विशेष प्रवासी विमानांना मान्यता देण्यात आली होती. आता घेतलेला निर्णय ‘एअर बबल’ व्यवस्था असलेल्या विमानसेवांना लागू होणार नसल्याचे नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी सांगितले.