काँग्रेसची राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड-राजनाथसिंह यांचा आरोप; लक्ष वळवण्याचा सरकारचा प्रयत्न- चिदम्बरम

इशरत जहॉँचा मुद्दा सोमवारी लोकसभेत भाजपने उपस्थित केला. दहशतवाद्यांना हुतात्मा ठरवून राष्ट्रीय सुरक्षेशी काँग्रेस तडजोड करत असल्याचा आरोप गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला.

शुन्य प्रहरात भाजपच्या किरीट सौमैय्या यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. इशरत संदर्भात जी चार कागदपत्रे गहाळ झाली आहे त्याचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे काय, अशी विचारणा त्यांनी केली. माजी गृहमंत्र्यांनी पहिल्या प्रतिज्ञापत्रात इशरतला दहशतवादी ठरवले. मात्र दुसऱ्या वेळी ते बदलण्यात आले. सोमय्यांनी या प्रकरणी यूपीए सरकारमधील आणखी एका माजी गृहमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख केला. मात्र लोकसभा अध्यक्षांनी त्यांना परवानगी नाकारली. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हा मुद्दा उपस्थित करण्यास आक्षेप घेतला. उत्तराखंडचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून परवानगी नाकारता मग हा मुद्दा कसा उपस्थित करता, असा त्यांचा सवाल होता. सदस्यांनी केवळ प्रश्न विचारल्याचे महाजन यांनी सांगितले.

रिजीजू यांची टीका

इशरत जहाँ प्रतिज्ञापत्र प्रकरणात माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांची सुटका करून घेण्याची धडपड सुरू असल्याचा आरोप गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी केला आहे. दुसऱ्या प्रतिज्ञापत्रावर अधिकाऱ्याने स्वाक्षरी केल्याचा चिदम्बरम यांचा दावा पटत नाही असे रिजीजू यांनी सांगितले.

१९ वर्षीय इशरत लष्कर-ए-तोएबाची दहशतवादी होती. ती चकमकीत मारली गेल्याच्या पहिल्या प्रतिज्ञापत्रातील दाव्याच्या विरोधात दुसरे प्रतिज्ञापत्र आहे.

अहमदाबादनजीक १५ जून २००४ इशरतसह, जावेद शेख, प्रणेश पिल्लई, अमदज अली अकबर राणा व झिशन जोहर चकमकीत मारले गेले होते. हे सर्व लष्कर- ए-तोएबाचे दहशतवादी होते, असा दावा गुजरात पोलिसांनी केला होता.

तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा त्यांचा कट होता, असेही पोलिसांनी म्हटले होते. याच आधारे गुजरात न्यायालयात पहिले प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते. मात्र दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात इशरत दहशतवादी होती याचे पुरावे नसल्याचे म्हटले होते. या प्रतिज्ञापत्राचा मसुदा चिदम्बरम यांनी तयार केल्याचा आरोप आहे.

चिदम्बरम यांचे प्रत्युत्तर

इशरत जहाँ प्रकरणावरून सातत्याने भाजपकडून टीकेचे लक्ष्य केले जात असल्याने माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम संतप्त झाले. इशरतजहाँ ज्या चकमकीत मारली गेली ती चकमक बनावट होती किंवा नाही हा मुख्य प्रश्न असून त्यापासून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी प्रतिज्ञापत्राचा वाद उकरून काढला जात आहे, असा प्रतिहल्ला चिदम्बरम यांनी चढविला आहे.

इशरतजहाँ प्रकरणातील मुख्य प्रश्नाकडून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी प्रतिज्ञापत्राचा वाद निर्माण करण्यात आला आहे. इशरतजहाँ ज्या चकमकीत ठार झाली ती चकमक बनावट होती किंवा नाही आणि जे चार जण कोठडीत होते ते या बनावट चकमकीत मारले गेले का हा मूळ प्रश्न आहे, असे चिदम्बरम यांनी ट्वीट केले आहे.