बंगळूरु : कर्नाटकचे मंत्री के. एस. ईश्वरप्पा हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी नसतील, तर त्यांचा मंत्रीपदाचा राजीनामा का घेतला जात आहे, असा प्रश्न कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना केला आहे. शिवकुमार म्हणाले की, ईश्वरप्पा यांनी कोणतेही चुकीचे काम केले नाही, असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे, मग ईश्वरप्पा यांचा राजीनामा कशासाठी घेतला जात आहे? कंत्राटदार संतोष पाटील यांच्या मृत्यूच्या प्रकरणात मंत्री ईश्वरप्पा यांचे नाव जोडले जात आहे. पाटील यांनी ईश्वरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. ग्रामविकास मंत्री असलेल्या ईश्वरप्पा यांनी आपल्या कामाची देयके अदा करण्यासाठी दलालीची मागणी केली होती. त्यासाठी त्यांना आपल्याला त्रास दिला, असा आरोप संतोष पाटील यांनी केला होता. त्यानंतर उडुपीतील एका हॉटेलमध्ये ईश्वरप्पा यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. याप्रकरणी ईश्वरप्पा यांना अटक करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात ईश्वरप्पा यांचे नावही घेण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी आपण मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, ईश्वरप्पा यांच्याविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला असला तरी त्यामुळे सरकार अडचणीत आलेले नाही, असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटले आहे. तपासातून लवकरच सत्य बाहेर येईल, असेही ते म्हणाले.