Jabalpur Bargi Dam Boat Accident Driver Mahesh Patel Statement: मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील बार्गी धरणात घडलेल्या बोट दुर्घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेत नऊ जणांचे मृतदेह आढळले असून आणखी बेपत्ता सहा जणांचा शोध सुरू आहे. या घटनेत एका आई व मुलाचा फोटो समोर आल्यानंतर अनेकांचे हृदय पिळवटून निघाले. मृत्यू समोर असतानाही आईने मुलाला आपल्या पोटाशी धरून ठेवले होते. २८ जणांना या दुर्घटनेतून वाचविण्यात यश आले. ज्यात बोटीचा चालक महेश पटेल हाही होता. आता महेश पटेल यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

बोटीत पाणी शिरल्यानंतर मी शक्य तितक्या प्रवाशांना वाचविण्याचा प्रयत्न केला, असे सांगतान महेश पटेलने नऊ मृत्यू झाल्याबद्दल माफी मागितली.

महेश पटेलने ३० एप्रिल रोजीचा घटनाक्रमही उलगडून सांगितला. ते म्हणाले, आम्ही जेव्हा खमरिया बेटावरून बोट घेऊन निघालो, तेव्हा हवामान सामान्य होते. पण जलाशयाच्या मध्यभागी पोहोचल्यानंतर जोरात वारे सुरू झाले. आम्ही परत फिरावे आणि हवामान खराब असल्याचा कोणताही इशारा किंवा पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती. वाऱ्याचा वेग तीव्र झाल्याने आणि लाटा बोटीवर आदळू लागल्याने आम्ही बोट किनाऱ्याकडे परत वळविण्याचा निर्णय घेतला.

Jabalpur Bargi Dam Boat accident
३० एप्रिल रोजी दुर्घटना घडल्यानंतर दोन दिवसांपासून बचाव कार्य सुरूच आहे.

एनडीटीव्हीशी बोलत असताना महेश पटेल पुढे म्हणाले, बोटीत पाणी शिरू लागल्याने प्रवासी घाबरले. पाणी आत शिरल्यानंतर मी कंट्रोल डेस्कला फोन करून दुसरी बोट पाठविण्यास सांगितले. तसेच या अपघातामधून वाचलेल्यांनी आरोप केला की, जोराने वाहणारा वारा आणि हेलकावे खाणारी बोट पाहून काही प्रवाशांनी बोट माघारी फिरवण्याची विनंती केली होती. मात्र पटेल यांनी हे नाकारताना म्हटले की, मला कुणीही अपघाताबद्दल इशारा दिला नव्हता.

अनेकांनी लाईफ जॅकेट घेण्यास दिला नकार

या दुर्घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात बोटीच्या खालच्या डेकमध्ये पाणी शिरू लागल्यानंतर कर्मचारी प्रवाशांना लाईफ जॅकेटचे वाटप करत आहेत. महेश पटेल यांनी याबाबत बोलताना सांगितले की, अनेक प्रवाशांनी सुरुवातीला लाईफ जॅकेट घेण्यास नकार दिला होता. कारण त्यांना नाचायचे होते, मजा करायची होती.

महेश पटेल गेल्या १५ वर्षांपासून येथील जलाशयात बोट चालविण्याचे काम करत आहेत. ते म्हणाले, जल पर्यटनाला सुरुवात केल्यानंतर पुढच्या ३० मिनिटांत ही दुर्घटना घडली. हवामान इतक्या वेगात बदलले की, पुढे काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. इंजिन रुममध्ये पाणी शिरल्यानंतर बोटीवरील नियंत्रण सुटले आणि ही बोट किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, याची जाणीव झाली.

बोटीवर अपुरे कर्मचारी

महेश पटेल आणि बोटीवरील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. बोटीवर तीन कर्मचारी असणे आवश्यक होते. मात्र दोनच कर्मचारी होते. त्यामुळे बोट बुडत असताना मी जास्तीत जास्त प्रवाशांना लाईफ जॅकेट घातले. तसेच बोटीतून मी सर्वात शेवटी बाहेर पडलो.

मला जेवण जात नाही, झोप येत नाही

बोटीवरील मदतनीस छोटेलाल गोंड आणि तिकीट खिडकीवरील कर्मचारी ब्रिजेंद्र यांनाही कामावरून काढून टाकण्यात आले आहे. महेश पटेल म्हणाले की, या नोकरीतून मला २७,००० वेतन मिळत होते. यातूनच माझ्या कुटुंबाची उपजीविका चालत होती. नोकरी गेल्यामुळे माझ्या कुटुंबावरही संकट निर्माण झाले आहे. मी मृतांच्या कुटुंबियांची माफी मागतो. मला मानसिक धक्का बसला आहे. ही घटना घडल्यापासून मला जेवण जात नाही, झोपही येत नाही.

हा अपघात एक नैसर्गिक आपत्ती होती. बोट चालविण्याचा माझ्याकडे वैध परवाना आहे. मी प्रशिक्षणही घेतले असून त्यात जीवरक्षक प्रमाणपत्रांचाही समावेश आहे. दर दोन वर्षांनी प्राधिकरणांकडून दिले जाणारे प्रशिक्षण मी घेत असतो, असाही दावा महेश पटेल यांनी केला.

३० एप्रिल रोजी सायंकाळी ६:१५ च्या आसपास बोट बुडाली. त्यानंतर शोध मोहीम राबविण्यात आली. ज्यात आतापर्यंत नऊ जणांचे मृतदेह आढळले आहेत. ४० तासांहून अधिक काळ शोध मोहीम सुरू असून आता बेपत्ता प्रवाशी सापडण्याची आशा मावळत चालली आहे.

वाचलेल्या प्रवाशांनी काय सांगितले?

या दुर्घटनेतून ७२ वर्षीय रियाझ हुसेन यांचा जीव वाचला. सुखरूप बाहेर काढल्यानंतर ते म्हणाले, मला नशिबाने साथ दिली. पाण्याखाली बुडालेले असताना डोके वर ठेवण्यासाठी मला पुरेशी जागा मिळाली. याच अवस्थेत जवळपास चार तास मी अडकून पडलो होतो. त्यानंतर मला मदत मिळाल्यामुळे मी वाचू शकलो.

मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी घटनेवर शोक व्यक्त केला. तसेच अपघातासाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली. तसेच भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी पर्यटन विभागामार्फत क्रूझ चालविण्यासाठी एक प्रमाणित कार्यपद्धती सुरू आणणार असल्याचे ते म्हणाले.

अपघात नेमका कसा घडला?

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, धरण परिसरात अचानक आलेले वादळ, क्रूझ बोटीच्या वरच्या डेकवर आणि खाली पर्यटक ये-जा करत असल्यामुळे गुरुत्वाकर्षण केंद्रात झालेला बदल यांसारख्या घटनांच्या एकत्रित परिणामामुळे ही घटना घडली असावी. जिल्हाधिकारी राघवेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे ९० लोकांची क्षमता असलेल्या बोटीत केवळ ४० प्रवासी होते. बार्गी धरणाच्या जलाशयाचा आनंद लुटण्यासाठी सुरू झालेला प्रवास अपघातामुळे एका भयंकर शोकांतिकेत बदलला.