India Pakistan War Tensions भारताने पाकव्याप्त जम्मू काश्मीरसह पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर मध्यरात्री जोरदार आक्रमण करत ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत नक्कीच मोठी कारवाई करेल याची कल्पना असताना भारतीय सैन्यानं अचूक वेळ साधत दहशतवाद्यांसह पाकिस्तानलाही धडा शिकवला आहे. अशातच या एअर स्ट्राईकच्या आघाताचे पडसाद समोर येत असताना या संदर्भात अतिशय महत्वाची माहिती समोर आली आहे. भारताच्या या हल्ल्यात देशाचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा करण्यात आला.

अजहरच्या कुटुंबातील १० जणांचा खात्मा, जवळच्या सहकाऱ्यांपैकी चार जणांचा मृत्यू

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने हल्ला करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यातील एका तळावर वास्तव्यास असलेल्या मसूद अझहरच्या कुटुंबातील १० तर निकटवर्तीय असलेल्या ४ सदस्यांचा मृत्यू झाला. या हल्यात मसूद अझहरचा भाऊ रौफ असगर हा गंभीर जखमी झाला आहे. तर ठार झालेल्यांमध्ये मसूद अझहरचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रौफ असगरचा मुलगा हुजैफा यांचा देखील समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.

मसूद अजहरने रचला होता संसदेवरच्या हल्ल्याचा कट

मसूद अझहरने आजवर भारताविरुद्ध अनेक वेळा मोठे कट रचले आहेत. मौलाना मसूद अझहर हा पाकिस्तानमध्ये वाढलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. २००१ मध्ये संसदेवरील हल्ल्याचा कट त्यानेच रचला होता. यासह उरी हल्ल्यातही मसूद अझहर हाच सूत्रधार होता. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पठाणकोट येथील लष्कराच्या तळावरील हल्ल्यातही त्यांनी भूमिका बजावली होती.

विक्रम मिसरी यांनी काय माहिती दिली?

पहलगामचा हल्ला हा अत्यंत क्रूर होता. तिथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या झाडून ठार केलं. जम्मू काश्मीरची स्थिती चांगली होत होती. ती बिघडवण्यासाठी पहलगामचा हल्ला झाला. मागच्या वर्षी सव्वा दोन कोटींहून अधिक लोकांनी काश्मीरला भेट दिली होती. पाकिस्तानने कुरापती काढण्यास सुरुवात केली. जम्मू काश्मीरमध्ये धार्मिक दंगे उसळवण्यासाठीही दहशतवादी हल्ला केला. TRF ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. ही संघटना पाकिस्तानशी संबंधित आहे, असं लष्कराच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे आता जगाला कळलं आहे. हा देश आंतरराष्ट्रीय स्तरावर दिशाभूल करण्याचंही काम करतो. साजीद मीरला त्यांनी मृत घोषित केलं होतं. पहलगाम हल्ल्यानंतर देशाच्या मनात चिड आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही निर्देश देऊनही पाकिस्तानने या दहशतवाद्यांविरोधात कुठलीही कारवाई केली नाही. आज पहाटे भारताने आपल्या अधिकाराचा उपयोग करत पाकिस्तानला जबाबदारीने उत्तर दिलं आहे. दहशतवादाचा पाया मोडण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी ही माहिती दिली.