Omar Abdullah on India-Pakistan Ceasefire: तीन दिवसांपासून सुरू असलेली भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी कारवाई आता थांबली आहे. आज (१० मे) सायंकाळी ५ वाजल्यापासून शस्त्रविराम करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी याची माहिती दिल्यानंतर संरक्षण मंत्रालयानेही त्याला दुजोरा दिला. या घटनेनंतर जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी समाधान व्यक्त केले आहे.
माध्यमांशी संवाद साधत असताना ओमर अब्दुल्ला म्हणाले, “शस्त्रविरामाची जी घोषणा झाली, त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. उशीरा का होईना, पण चांगला निर्णय झाला. दोन-तीन दिवसांपूर्वी हा निर्णय घेतला असता तर आपल्याला जो रक्तपात पाहावा लागला, तो दिसला नसता. अनेक अमूल्य जीव आपण या दिवसांत गमावले. ते जीव वाचू शकले असते. पण अखेर पाकिस्तानच्या डिजीएमओंनी फोन उचलून आमच्या डिजीएमओंशी चर्चा केली आणि शस्त्रविराम प्रत्यक्षात आला.”
आता जम्मू आणि काश्मीर सरकार जे जे नुकसान झाले, त्याचा आढावा घेईल. लोकांना नुकसान भरपाई दिली जाईल. जे लोक जखमी आहेत, त्यांच्यावर चांगला उपचार होईल. सरकारी योजनेच्या माध्यमातून त्यांना मदत करू. आज सकाळी घोषणा झाल्याप्रमाणे ज्यांचे मृत्यू झाले, त्यांनाही मदत दिली जाईल. मृतांना परत आणता येणार नाही, पण त्यांच्या कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची प्रार्थना करू, असेही मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले.
जम्मू-काश्मीरचे प्रचंड नुकसान झाले
ओमर अब्दुल्ला पुढे म्हणाले की, जम्मू-काश्मीरचे खूप नुकसान झाले आहे. पण त्यात पूंछ जिल्ह्याला वाईट पद्धतीने फटका बसला आहे. राजौरी, तंगधारचे खूप नुकसान झाले. सर्व जिल्हा आयुक्तांना नुकसानाचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बऱ्याच दिवसांपासून विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हज यात्रेकरूंना पाठवता येत नव्हते. विमानतळ सुरू झाल्यानंतर यात्रेकरूंची पाठवणी करू.
जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमेवर धुमश्चक्री सुरू होती. ७ मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर पाकिस्तानकडून जबर लष्करी कारवाईस सुरूवात झाली. जम्मू-काश्मीर ते गुजरातपर्यंतच्या सीमाभागात पाकिस्तानकडून ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांचे बळी गेले. तर भारतीय लष्कर आणि काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही वीरमरण आले.