Omar Abdullah on Operation Sindoor : भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. बुधवारी ७ मे रोजी मध्यरात्री केलेल्या या हवाई हल्ल्यात भारताने पाकिस्तानचे दहशतवादी तळ लक्ष्य केले होते. या हवाई हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हीच योग्य पद्धत होती, असं ते म्हणाले.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, “सुरुवात पहलगामपासून झाली, जिथे आपले २६ निष्पाप लोक मारले गेले. हे आम्ही विसरलो नाही. याविरोधात आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ असं सांगितलं होतं. उत्तर देण्याची हीच पद्धत होती. भारतीय लष्कराने पाकिस्तानात कोणताही नागरीक किंवा लष्करला लक्ष्य केलं नाही, फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य केलं. कारण, त्यांनीच जम्मू काश्मीरमध्ये दहशत माजवली होती.”

आम्हाला युद्ध नकोय

ते पुढे म्हणाले, “सुरुवात त्यांच्याकडून झालीय, आमच्याकडून नाही. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला नसता तर अशी वेळ आलीच नसती. आम्ही येथे व्यवस्थित राहत होतो. पहलगामविरोधात आम्हाला उत्तर द्यायचंच होतं. आम्हाला युद्ध नकोय. आम्ही आधीच्या युद्धात पाहिलंय की युद्धामुळे जम्मू काश्मीरलाच सर्वाधिक नुकसान पोहोचतं. पण शेजारी राष्ट्रांनी त्यांच्या बंदुका शांत कराव्यात, जेणेकरून येथून बंदुका चालणार नाहीत.”

याव्यतिरिक्त, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी नियंत्रण रेषेवरील (LoC) सुरक्षा उपायांचे मूल्यांकन करण्यासाठी अधिकाऱ्यांची भेट घेतली. तर, जम्मू काश्मीरच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी चर्चाही केली आहे.

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून भारतात तीव्र संताप व्यक्त केली जात होती. पाकिस्तानला धडा शिकवला जावा, अशी मागणी केली जात होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील भारताला समर्थन मिळत होतं. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय बैठका होत असताना लवकरच काहीतरी मोठं घडण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याचं उत्तर आता मिळालं असून भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तब्बल ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत.