माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी हे “भारतीय लोकशाहीचे आदर्श नेते” असल्याचे केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी बुधवारी म्हटले आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि सन्मानाने वागले पाहिजे असेही ते म्हणाले आहेत.

न्यूज नेशन वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, नेहरू आणि वाजपेयी हे भारताच्या लोकशाहीचे दोन आदर्श नेते होते आणि दोघेही मी माझ्या लोकशाहीचे सन्मानाचे पालन करीन असे म्हणायचे. “अटलजींचा वारसा आमची प्रेरणा आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचेही भारतीय लोकशाहीमध्ये मोठे योगदान होते,” असे गडकरी यावेळी म्हणाले.

नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात संसदेत झालेल्या गोंधळाबद्दल गडकरी बोलत होते. अधिवेशनादरम्यान संसदेत तीन कृषी कायद्यांविरोधात, इंधन दरात वाढ आणि पेगॅसस स्पायवेअरवरुण दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी गोंधळ घातला होता. विरोधकांनी या मुद्द्यांवर सरकारकडे चर्चेची मागणी केली होती. त्यामुळे वारंवार सहागृह तहकूब करावे लागले होते.

या गोंधळावरुन गडकरी म्हणाले की, “सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांना एकदा आत्मपरीक्षण करू द्या. कारण आज जो विरोधीपक्ष आहे तो उद्या सत्ताधारी असणार आहे. तर  आजचा सत्ताधारी पक्ष उद्याचा विरोधी पक्ष असणार आहे. त्यामुळे आमच्या भूमिका बदलत राहतात.

महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून काम करतानाची आठवण करून देताना गडकरी म्हणाले की, एक वेळ अशी होती जेव्हा त्यांनी सभागृहात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता. त्या दिवसांत एकदा मी अटलजींना भेटलो आणि त्यांनी मला सांगितले की लोकशाहीत काम करण्याचा हा कोणताही मार्ग नाही आणि लोकांपर्यंत तुमचा संदेश पोहोचवणे महत्त्वाचे आहे.”

नितीन गडकरी म्हणाले की, “सत्तेतील आणि विरोधी पक्षातील सर्व पक्षांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. “मी सुद्धा पक्षाचा अध्यक्ष राहिलो आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांनी एकदा आत्मपरीक्षण केले पाहिजे. आज विरोधी पक्ष उद्याचा सत्ताधारी पक्ष आहे तर आज सत्तेत असलेला पक्ष उद्याचा विरोधी पक्ष आहे. आमच्या भूमिका बदलत राहतात.”

“मी माझ्या आयुष्यात इतकी वर्षे विरोधात काम केले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आदराने वागले पाहिजे. संसदेत नुकत्याच झालेल्या व्यत्ययामुळे दुखः झाले,” असे ते म्हणाले.

यशस्वी लोकशाहीसाठी मजबूत विरोध आवश्यक: गडकरी

सत्ताधारी आणि विरोधकांना लोकशाहीची दोन चाके असे म्हणताना गडकरी म्हणाले, “ही लोकशाही यशस्वी करण्यासाठी सशक्त विरोधी पक्ष देखील आवश्यक आहे. नेहरूंनी वाजपेयीजींचा नेहमीच आदर केला आणि ते म्हणाले की विरोधी पक्ष देखील आवश्यक आहे. म्हणून काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून मजबूत झाला पाहिजे आणि विचारधारेच्या आधारावर त्यांनी जबाबदार विरोधकाचे काम केले पाहिजे, ही त्यांच्यासाठी माझी सदिच्छा आहे.”