छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका 'जीव झाला येडापिसा'मध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे निधन झाले आहे. करोनामुळे त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. १९ मे रोजी हेमंत यांनी अखेरचा श्वास घेतला. हेमंत यांच्या निधनाने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अभिनेता सुप्रित निकमने सोशल मीडिया पोस्टद्वारे हेमंत जोशी यांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्याने हेमंत यांच्यासाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे. 'काय लिहू आणि कसं लिहू सुचेना.. हेमंत काका नुकताच "जीव झाला येडपिसा" मधून तुम्ही घराघरात पोहोचला होता. लोक तुम्हाला जोशी कमी आणि जीव झाला मधले भावे म्हणून ओळखायला लागले होते. तुमच्या किती आठवणी सांगू तितकं कमी आहे' असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. पुढे तो म्हणाला, 'मला आठवतो तो जळगाव ते सांगलीचा लांबचा प्रवास. त्या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत नसता तर कदाचित डिप्रेशनमध्ये गेलो असतो मी. एकाच सिनेमात काम करताना एका निर्मात्याने माझे पैसे बुडवल्याने प्रचंड निराश आणि खचलेला मी आणि मला सावरणारे आणि धीर देणारे तुम्ही. तुमचं ते वाक्य कायमच लक्षात राहील "तुझे ७० हजार बुडाले पण ७० लाखांचा अनुभव घेतलास तू, स्वामी असा अनुभव प्रत्येकाला देत नसतात, डोकं शांत ठेव आणि ऐश कर" आज तुमच्या रूपाने मी माझा एक मित्र हो मित्रच गमावला. कारण वडीलधारी असूनही तुम्ही जवळच्या मित्रा पेक्षा कमी नव्हतात. काका तुम्ही नेहमी तक्रार करायचात की मी फोन करत नाही.. आता कुणाला फोन करू..? शेवटचं भेटायचं ही राहून गेलं हेमंत काका. भावपूर्ण श्रद्धांजली हेमंत काका..' मराठी चित्रपटसृष्टीमधील इतर कलाकारांनी देखील सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. View this post on Instagram A post shared by Sumedha Datar (@sumedhadatar) हेमंत यांनी आजवर अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'जीव झाला येडापिसा' या मालिकेत ते भावे ही भूमिका साकारत होते. 'नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे', 'तेंडल्या', 'लायब्ररी', 'बालगंधर्व' या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. रात्रीस खेळ चाले मालिकेतही ते झळकले होते.