जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात बचावकार्यादरम्यान लष्कराचे नऊ जवान वाहून गेल्याची माहिती आहे. मुसळधार पावसामुळे जम्मू-काश्मिरमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून सध्या या ठिकाणी लष्काराने युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेतले आहे. बुधवारपासून येथे कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने थैमान घातले असून, झेलम नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
गेल्या चार दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, खोऱयातील सर्वच नद्यांना पूर आले आहेत. या भागात स्थानिक प्रशासन आणि लष्काराकडून मदतकार्य सुरू आहे. दरम्यान, आज पुलवामा जिल्ह्यात बचावकार्य करीत असताना पूराच्या लोंढयात ९ जवान वाहून गेले. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या जवानांचा शोध घेण्यात येत आहे. लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर खो-यातील पुराच्या विळख्यातून जवळपास ५००० नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.
जम्मूसह परिसरात होणार्‍या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी झालेल्या पूर आणि भूस्खलनामुळे जवळपास १०० जणांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिक बेपत्ता आहेत. काही लोक झेलम नदीच्या पुरात वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुराच्या पाण्यामुळे राज्यातील अनेक गावांशी संपर्क तुटला आहे.