सीमा ओलांडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी यमसदनी धाडले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मारण्यात आलेले दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबा संघटनेचे असल्याचे समजते. आज (मंगळवार) सकाळपासूनच काश्मीर येथील गांदरबल येथे भारतीय जवान आणि दहशवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती. दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर परिसरात सर्च ऑपरेशन जारी करण्यात आले आहे.

चकमक सुरू असतानाच बाजूचा परिसर रिकामा करण्यात आला होता. मारले गेलेल्या दहशतवाद्यांकडून २ एके-४७ जप्त करण्यात आली. यापूर्वी १६ जानेवारी रोजी पहेलगाम येथे ३ दहशतवाद्यांना भारतीय लष्कराच्या जवानांनी चकमकीत ठार मारले होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.