सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) मंगळवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) परिसराचा ताबा घेतला. सध्या विद्यापीठ आणि सभोवतालच्या परिसरात कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, दिल्ली न्यायालयाने मंगळवारी उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य या दोघांना शरण येण्यास सांगितले. या दोघांवर देशद्रोही घोषणा दिल्याचा आरोप असून, त्यांनी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्यासाठी शरण यावे, असे न्यायालयाने सांगितले. दिल्ली पोलिसांनी या दोघांना ‘जेएनयू’त जाऊन अटक करण्याच्या परवानगीसाठी दाखल केलेली याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली. उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांना शरण जाण्याची जागा निवडण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे.