नवी दिल्ली : नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) राजकीय विवाद आहेत, मात्र विद्यापीठ राष्ट्रविरोधी नाही, असे ठाम मत विद्यापीठाच्या कुलगुरू शांतिश्री धुलपदी पंडित यांनी सांगितले. रामनवमीच्याा दिवशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य आणि डाव्या संघटनांचे सदस्य यांच्यात वाद झाला आणि या वादाला हिंसक वळण लागले. त्यावर कुलगुरूंनी आपले मत व्यक्त केले. या वादावरून वेगळा अर्थ लावला जात असून विद्यापीठाला राष्ट्रविरोधी ठरवले जात आहे. प्रत्येक बाजूची भूमिका वेगवेगळी असते. विद्यापीठाची शिस्तपालन समिती या घटनेचा तपास करत असून लवकरच अहवाल सादर करणार आहे, असे पंडित यांनी सांगितले. विद्यापीठातील हिंसक वादामुळे प्रतिमा मलिन होत आहे. विद्यापीठात राजकीय वाद असले तरी विद्यापीठ राष्ट्रविरोधी नाही. सध्या देशसेवा करणारे ६० टक्के प्रशासकीय अधिकारी या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. विद्यापीठातील ९० टक्के विद्यार्थी अराजकीय असून केवळ भविष्यातील करिअर घडवण्यासाठी ते विद्यापीठात येतात, असे कुलगुरूंनी सांगितले.