जनता दल युनायटेड म्हणजेच जदयूच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पक्षाकडून दावेदारी सांगण्याचे संकेत देणारी वक्तव्य करण्यात आल्यानंतर आता या प्रकरणात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. जदयूचे राष्ट्रीय महासचिव के.सी. त्यागी यांनी यासंदर्भात भाष्य करताना नितीश कुमार यांच्यामध्ये पंतप्रधान बनण्याची योग्यता आहे. मात्र ते पंतप्रधान पदाचे दावेदार नाहीत, असं स्पष्ट केलं आहे.  जदयूच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीमध्ये राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी नितीश कुमार हे पंतप्रधान पदाचे दावेदार नसले तरी त्यांच्यामध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवारामध्ये आवश्यक असणारे सर्व गुण असल्याचं म्हटलं आहे. राजीव रंजन यांच्या याच वक्तव्यामुळे बिहारमधील राजकीय वर्तुळामध्ये सध्या राज्यात सत्तेत असणाऱ्या जदयू आणि भाजपा युतीमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर त्यागी यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यागी यांनी नितीश कुमार हे पंतप्रधान पदाचे दावेदार नाहीत. आमचा पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील (एनडीए) एक मबजूत घटक पक्ष असून एनडीएचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. जेडीयू ही राज्यात आणि केंद्रात भाजपासोबत आहे, असं त्यागी म्हणालेत.

भाजपा जदयूमधील मतभेदाची चर्चा कशामुळे?

नितीश कुमार यांच्यामध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवारामध्ये आवश्यक असणारे सर्व गुण आहेत. मात्र पंतप्रधान बनण्यासाठी आवश्यक असणारे गुण आणि पंतप्रधान पदासाठी दावा करणे या दोघांमध्ये फार अंतर आहे. त्यामुळे ज्या लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम असेल त्यांना मी हे सांगू इच्छितो की आमच्या नेत्यामध्ये पंतप्रधान बनण्यासाठी आवश्यक असणारे सर्व गुण आहेत, असं ललन सिंह म्हणाले होते. त्यानंतर जदयू आणि भाजपाच्या मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

जेडीयूचं स्पष्टीकरण…

पाटणा येथील जेडीयूच्या मुख्य कार्यालयामध्ये पत्रकारांशी चर्चा करताना त्यागी यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. नितीश कुमार हे पंतप्रधान पदाचे उमेदवार नाहीत. आमचा पक्ष एनडीएसोबत आहेत. पंतप्रधान मोदीच आमचे नेते आहेत. तसेच जदयू आणि भाजपामध्ये समन्वय रहावे म्हणून एक संयुक्त समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणी जदयूने केलीय. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना अशी समन्वय समिती होती असंही जदयूने म्हटलं आहे. राष्ट्रीय परिषदेची बैठक संपल्यानंतर त्यागी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. तसेच आम्ही एनडीए आणि भाजपासोबत एकजूटीने राहू असंही या बैठकीत ठरवण्यात आल्याचं त्यागी यांनी म्हटलं आहे.

…तर एकटे लढणार

एनडीएच्या विस्तारासंदर्भातही ललन सिंह यांनी भाजपाला इशारा दिलाय. भाजपा उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये जदयूला एनडीएमध्ये सहभागी करुन घेत नसेल तर आम्ही तिथे स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढवू. आम्ही यासाठी तयारी करत असल्याचंही ललन सिंह म्हणाले आहेत. याच निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर समन्वय समिती स्थापन करण्याची मागणी जदयूकडून करण्यात आलीय.

जातिनिहाय जनगणनेसंदर्भात स्पष्टीकरण

त्यागी यांनी जातिनिहाय जनगणनेसंदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ओबीसीच्या अंतर्गत काही जातीच्या लोकांना अधिक फायदा मिळत असल्याच्या चर्चा मागील बऱ्याच काळापासून सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रोहिणी कमीशनचा अहवाल जाहीर करावा अशी आमची मागणी असल्याचं त्यागी म्हणाले.

नितीश कुमार यांच्यासमोर घोषणाबाजी झाली अन्…

नितीश कुमारही या बैठकीसाठी उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर ते बाहेर पडले तेव्हा पत्रकारांनी त्यांना पंतप्रधान मटेरियल असणाऱ्यासंदर्भात प्रश्न विचारले असता नितीश यांनी उत्तर देण्यास नकार दिला. मला अशाप्रकारच्या चर्चांमध्ये रस नाही. मी केवळ माझं काम करतो, असं नितीश म्हणाले. मात्र नितीश कुमार यांना विचारण्यात आलेला प्रश्न ऐकून तेथे उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी, ‘देश का पीएम कैसा हो नितीश कुमार जैसा हो.’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. ही घोषणाबाजी ऐकून नितीश कुमार थोडे गोंधळात पडले. मात्र त्यांचे समर्थक घोषणाबाजी करत राहिले. अखेर नितीश यांनी या घोषणाबाजीदरम्यानच तिथून काढता पाय घेतला.