‘स्वच्छ भारत’ या आपल्या महत्त्वाकांक्षी मोहिमेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमंत्रित केल्याबद्दल अभिनेते कमल हासन यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. तथापि, यापूर्वीपासूनच आपण असे प्रयत्न करीत असून कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता आपण प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे कमल हसन यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या २० वर्षांपासून चाहत्यांच्या मदतीने आपण अशा प्रकारच्या मोहिमेशी संबंधित असून त्याचे आता समाजसेवा संघटनेत रूपांतर झाले आहे. आपले कार्य सुरूच राहणार असून हा जनसंपर्काचा प्रयत्न नाही, ही जनसेवा आहे व त्याचा एक भाग आहोत, अशी आपली धारणा आहे. या मोहिमेत अन्य नऊ प्रतिष्ठितांसह सहभागी होण्याचे आवाहन केले असले तरी केवळ नऊच नव्हे तर शक्य झाल्यास लाखोंचा सहभाग मिळवू, असे हासन म्हणाले.