Kangana Ranaut : महाराष्ट्रात मराठी भाषेचा आणि हिंदीचा मुद्दा चांगलाच गाजला. त्यानंतर त्रिभाषा सूत्रावरुन हिंदी विषय हा तिसरा विषय असला पाहिजे या आशयाचे अध्यादेश सरकारने आणले होते. ते रद्द करण्यात आल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचा विजयी मेळावा मुंबईत पार पडला. दरम्यान या सगळ्या प्रकरणावरुन आता अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौतने भाष्य केलं.
काय म्हटलं आहे कंगना रणौतने?
महाराष्ट्रात भाषेवरुन लोकांमध्ये फूट पडायला नको. आपल्या देशातले लोक एकमेकांशी वेगवेगळ्या मार्गाने एकमेकांना जोडू पाहात आहेत. अशा प्रकारच्या घटना घडल्या तर लोक एकोप्याने कसे राहणार? भाषेचा वाद झाल्याने लोकांमध्ये अशा प्रकारे फूट पडत असेल तर कसं चालेल? अनेक लोक पर्यटनासाठी विविध भागांमध्ये जात असतात. अनेकांना विविध भाषा येतात, अनेकांना येत नाही. मग तेव्हा काय त्यांना मारहाण केली जाणार का? आपल्या देशाचा एकोपा कायम राहिला पाहिजे.
भाषा असो किंवा कुठलाही विषय आपण…
भाषा असो किंवा कुठलीही गोष्ट जर देशाचं विभाजन करत असेल तर अशा गोष्टींपासून लांब ठेवले पाहिजेत. आपण परस्परांमध्ये एकोपा ठेवून आहोत पण अशा प्रकारच्या घटना घडल्या की त्या सगळ्या एकोप्यावरुन लोकांचा विश्वास उडू शकतो. हा कुणाला वाटण्याचा विषय नाही असं कंगनाने म्हटलं आहे. एनडीटीव्हीशी कंगनाने संवाद साधला. त्यावेळी कंगनाने हे विधान केलं आहे.
महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्राबाबतचा अध्यादेश काढण्यात आला होता. यामध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी किंवा अन्य कुठल्याही भाषेचा पर्याय होता. मात्र हिंदी सक्ती राज्यात लागू करु देणार नाही असं मनसे, शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी म्हणत आंदोलन सुरु केलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी सरकारने दोन्ही अध्यादेश रद्द केले. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत विजयी मेळावा घेतला. याआधी एका गुजराती व्यापाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना मुंबईत घडली होती. याबाबत प्रश्न विचारला असता कंगनाने भाषेच्या मुद्द्यावर आपल्यामध्ये विभाजन व्हायला नको असं म्हटलं आहे.