इंदूर-पाटणा एक्सप्रेसला अपघात झाल्याने २० वर्षांच्या रुबी गुप्तावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लवकरच विवाह बंधनात अडकणाऱ्या रुबीचे वडिल अपघातानंतर बेपत्ता झाले आहेत. रेल्वे अपघातात रुबीच्या एका हाताचे हाड मोडले आहे. मात्र या स्थितीतही रुबी बेपत्ता वडिलांचा शोध घेते आहे.

रुबीचा विवाह १ डिसेंबरला होणार आहे. याच विवाह सोहळ्यासाठी रुबी इंदूरहून आझमगढमधील मऊला जात होती. भावंडांमध्ये मोठी असलेली रुबी दोन बहिणी आणि एका भावासह प्रवास करत होती. वडिल राम प्रसाद गुप्ता आणि कुटुंबाचे निकटवर्तीय असलेले राम प्रमेश सिंह हेदेखील या भावंडांसह प्रवास करत होते.

‘मी वडिलांना प्रत्येक ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कुठेच सापडले नाहीत. काहींनी मला रुग्णालय आणि शवागारात जाऊन वडिलांचा शोध घेण्यास सांगितले. मात्र आता मी काय करु, हेच मला समजत नाही. आता माझे लग्न तरी ठरलेल्या दिवशी होणार आहे की नाही, हेदेखील माहित नाही. आता मला माझ्या वडिलांचा शोध घ्यायचा आहे,’ अशी करुण कहाणी रुबीने सांगितली. रुबी तिच्यासोबत लग्नाचे कपडे आणि दागिने घेऊन जात होती. मात्र आता यातील कोणतेच सामान तिला सापडत नाही आहे. रुबीने आतापर्यंत या प्रकरणी कोणतीही तक्रारदेखील नोंदवली नाही आहे.

रविवारी पहाटे उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ इंदूर-पाटणा एक्सप्रेसला अपघाता झाला. या अपघातात एक्सप्रेसचे १४ डबे रुळांवरुन घसरले. हा अपघात नेमका का झाला, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या अपघातात आतापर्यंत १०० पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. या अपघातावेळी गाड्यांचे डबे एकमेकांना आदळले. त्यामुळे प्रवासी एकमेकांवर पडले. प्रवासी गाढ झोपेत असताना हा भीषण अपघात झाला.