पंजाबमधील राजकीय घडामोडीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस अध्यक्षपदावरून काँग्रेसमधील दोन समोरासमोर आले आहेत. कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्षपदाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “काँग्रेसमध्ये निवडून आलेला अध्यक्ष नाही. निर्णय कोण घेत आहे? हे आम्हाला माहिती ना्ही.”, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. या विधानासह त्यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलवण्याची मागणी देखील केली. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी अध्यक्षपदाबाबत केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

दिल्ली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानाबाहेर निदर्शनं केली. ‘लवकर बरे व्हा कपिल सिब्बल’ असे फलक झळकावत निषेध नोंदवला. त्यामुळे येत्या काही दिवसात काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे काँग्रेस नेते अजय माकन यांनी कपिल सिब्बल यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. “त्यांना काँग्रेसने ओळख दिली आहे. संघटनात्मक पार्श्वभूमी नसताना सोनिया गांधी यांनी कपिल सिब्बल यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद दिलं. पक्षात सर्वांच ऐकलं जातं. पक्षाला छबी खराब करण्याच प्रयत्न करू नका. पक्षाने तुम्हाला ओळख दिली आहे.” अशी टीका त्यांनी यावेळी केली.

काँग्रेस पक्षाच्या जी-२३ नेत्यांनी मागच्या वर्षी सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेतृत्व बदलाच्या सूचना केल्या होत्या. त्यावरून काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या नेत्यांना खडे बोल सुनावले होते. जी २३ मधील नेते करोनाकाळात बेपत्ता होते, अशी बोचरी टीका त्यांनी केली होती. त्याला कपिल सिब्ल यांनी उत्तर दिलं होतं. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक २३ जूनला होणार होती. मात्र करोनाचं कारण देत पुन्हा एकदा निवडणूक टाळण्यात आली होती. तारीख जाहीर झाल्याच्या अवघ्या काही तासातच निर्णय बदलण्यात आला होता. विशेष म्हणजे अध्यक्षपदाची निवडणूक तिसऱ्यांदा टाळण्यात आली. त्यामुळे पुढची तारीख जाहीर होईपर्यंत सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद राहाणार आहे.