केरळमध्ये रविवारी मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे मृतांची संख्या २१ वर पोहोचली आहे. यातील १३ लोकांचा कोट्टायममध्ये तर ८ लोकांचा इडुक्कीमध्ये मृत्यू झाला. राज्य सरकारने ही माहिती दिली आहे. भूस्खलन ग्रस्त भागात सातत्याने बचावकार्य सुरू आहे. लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), पोलीस आणि अग्निशमन दल तसेच स्थानिक लोकांनी रविवारी सकाळी कूट्टीकल आणि कोक्कायार पंचायत भागात बचाव कार्य सुरू केले जेथे शनिवारपासून मुसळधार पावसासह अनेक भूस्खलनामुळे १२ पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत.

कोट्टयम, इडुक्की आमि पथनमथिट्टा इथल्या पर्वतीय भागात पूर आला असून मीनाचल आणि मणिमाला या नद्या ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. समोर आलेली परिस्थिती भीषण असल्याचं सांगत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले, अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यभर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

नागरिकांनी आपल्या घरातच किंवा एखाद्या सुरक्षित ठिकाणी थांबावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पावसामुळे सध्या दक्षिण आणि मध्य भागातल्या जिल्ह्यांना फटका बसलेला आहे. संध्याकाळपर्यंत पावसाची तीव्रता अधिक वाढून उत्तरेकडच्या जिल्ह्यांनाही फटका बसण्याची शक्यता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

राज्यातल्या काही नद्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होणार असून काही धरणांचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. धरण आणि नदीपात्राच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. तर पथनमथिट्टा, कोट्टयम, एर्नाकुलम, इडुक्की आणि थ्रिसूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तर थिरुवनंतपुरम, कोल्लम, अलाप्पुझा, पलक्कड, मलप्पुरम, कोझिकोडे आणि वायनाड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे की ते केरळमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. लोकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार केरळ सरकारला सर्व शक्य मदत करेल.