तीन जण बसू शकणाऱ्या ऑटोत सात-आठ जण कोंबून बसवल्याचं चित्र तुम्ही पाहिलंच असेल. एकट्या ड्रायव्हर सीटवरच दोन जण जास्तीचे बसवले जातात. ग्रामीण भागात आणि छोट्या शहरांमध्ये हे चित्र मोठ्या प्रमाणात दिसतं. मात्र केरळमध्ये आता ड्रायव्हर सीटवर प्रवाशाला बसवता येणार नाही. याचं कारण म्हणजे बसवल्यानंतर जर ऑटोचा अपघात झाला तर त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही. तीन चाकी मालवाहू गाडीमध्ये किंवा प्रवासी वाहनात वाहनाचा मालक अथवा प्रवाशाने चालकासोबत सीट शेअर करू नये, ही कृती विमा पॉलिसीच्या अटींचे उल्लंघन आहे, असे मत केरळ हायकोर्टाने नोंदवले आहे. "जर विम्याच्या दावेकर्याने वाहनाचा मालक म्हणून वाहनात प्रवास केला नसेल, तर त्याला विम्याच्या पॉलिसीमध्ये संरक्षण दिले जाणार नाही. याशिवाय तीन चाकी मालवाहू गाडीमध्ये, ड्रायव्हरसीटवर त्याच्यासोबत इतर कोणीही बसू शकत नाही. प्रवासी किंवा वाहनाचा मालक या नात्याने इतर कोणत्याही व्यक्तीने ड्रायव्हरची सीट शेअर करू नये. असं करणारी कोणतीही कृती विमा धोरणाच्या अटींचे उल्लंघन आहे," असं एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती ए. बादरुदीन यांनी म्हटलं. तसेच त्यांनी मोटार वाहन न्यायाधिकरणाने विमा कंपनीवर अशा निरुपयोगी प्रवाशाची भरपाई करण्यासाठी केलेली मागणी पूर्ण केली जाणार नसल्याचं सांगितलं. नेमकं प्रकरण काय? २००८ मध्ये एक व्यक्ती ऑटोमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी बसून प्रवास करत होती. त्या ऑटोचा अपघात होऊन ही व्यक्ती जखमी झाली. तो ऑटो ड्रायव्हरनेच पलटी केल्याचं या शेजारी बसलेल्या जखमी व्यक्तीने सांगितलं. त्यामुळे नुकसानभरपाई म्हणून दीड लाख रुपये देण्यात यावे, अशी मागणी त्या व्यक्तीने केली. अपीलमध्ये, विमा कंपनीने वादग्रस्त उत्तरदायित्वावर वाद घातला. त्यांच्या मते, जखमी हा मालवाहू वाहनातील नि:शुल्क प्रवासी होता. त्यामुळे त्याची भरपाई कशी केली जाऊ शकते. पुढे प्रकरण केरळ हायकोर्टात पोहोचले. तिथे न्यायमूर्ती ए. बादरुदीन यांनी “तीन चाकी मालवाहू गाडीमध्ये किंवा प्रवासी वाहनात वाहनाचा मालक अथवा प्रवाशाने चालकासोबत सीट शेअर करू नये, ही कृती विमा पॉलिसीच्या अटींचे उल्लंघन आहे,” असे सांगितले.