पती पत्नीचं भांडण आणि वाद तुम्ही ऐकले असतील. प्रत्येक जोडप्यात छोटे-मोठे वाद होतात. काही वाद विकोप्याला जातात आणि त्यातून काहीतरी वाईट घडल्याचं तुम्ही ऐकलं असेल. अशाच एका घटनेत पत्नीने तब्बल सहा वर्ष पतीला जेवणातून विष दिल्याचं समोर आलंय. पण तिचं विष देण्यामागचं कारण ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील पाला शहरातील एका महिलेला तिच्या पतीला अन्नातून विष दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पती सतीश (३८) याच्या तक्रारीनंतर आशा सुरेशला (३६) पोलिसांनी अटक केली आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या जोडप्याचं २००६ साली लग्न झालं आणि ते पाला येथे राहत होते. सुरुवातीला सतीशला त्याच्या व्यवसायात संघर्ष करावा लागला, पण आईस्क्रीम उद्योगात जम बसल्यानंतर २०१२ मध्ये या जोडप्याने पलक्कडमध्ये स्वतःचे घर खरेदी केले. तक्रारीनुसार, एकदा आशाचे सतीशसोबत क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर जसजसा वेळ निघून गेला तसतसे सतीशच्या लक्षात आले की त्याला थकल्यासारखे जाणवत आहे. त्यांने डॉक्टरांचा सल्ला घेतला. तर, त्याला शरीरातील साखरेच्या कमी प्रमाणामुळे हे होत असल्याचं डॉक्टरांनी सुचवलं. परंतु, औषधोपचार करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. याच दरम्यान, सप्टेंबर २०२१ पासून सतीशने घरचे जेवण टाळले आणि त्याची प्रकृती सुधारत असल्याचे लक्षात आले. त्याला त्याच्या पत्नीवर संशय आल्याने त्याने आपल्या मैत्रिणीला बायको आपल्या जेवणात काही मिसळत आहे का, याचा शोध घेण्यास सांगितले. जेव्हा मैत्रिण आशाकडे गेली तेव्हा तिने त्याची बायको जेवणात विष मिसळत होती, असं सांगितलं. तसेत तिने ती मिसळत असलेल्या वस्तूचा फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवला. यानंतर, त्या व्यक्तीने घरातील सीसीटीव्ही फुटेज घेत पोलिसांना तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश कार्यालयात घेऊन जात असलेल्या जेवणात आणि पाण्यातही ती विष मिसळत होती. तिच्या म्हणण्यानुसार, सतीशने तिला त्याच्या संपत्तीतून काहीही दिले नाही. तो सर्व मालमत्ता त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आणि भावांना देईल, अशी तिला शंका होती, त्यामुळे तिने हा प्रकार केला. हे कारण ऐकून पती आणि पोलिसांनाही धक्का बसला. यासंदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे.