देशात मेट्रो, मोनो आणि बुलेट ट्रेन सारख्या विकासाच्या गोष्टींची सांगड घातली जात असताना आजही देशातील खेडी दळण-वळणाच्या प्राथमिक गरजांपासून वंचित असल्याचे वास्तव पुन्हा एकदा नजरेसमोर आले आहे. गुजरातमधील छोटा उदेपुर जिल्ह्यातील एकूण १६ गावांतील जवळपास १२५ विद्यार्थ्यांना नदीवर पूल नसल्याने शाळेत जाण्यासाठी चक्क पोहत जावे लागत आहे.तिलकवाडा तालुक्यातील शासकीय शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना दररोज हीरान नदी ओलांडावी लागते परंतु नदीवर अद्याप कोणताही पूल नसल्याने विद्यार्थ्यांवर पोहत जाण्याची नामुष्की ओढावते आहे. इंडियन एक्स्प्रेसने यावर प्रकाशझोत टाकताच स्थानिक प्रशासनाचे डोळे उघडले आहेत. सोमवारी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱयांनी गावकऱयांची भेट घेऊन गावकऱयांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि नदीवर पूल बांधण्याचे आश्वासन दिले आहे. गावकऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱयांनी राज्य सरकारकडे या पुलासाठी १३.५ कोटींचा प्रस्ताव मांडला असून तो मान्य झाल्यावर त्वरित काम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच या पुलामुळे शाळेत जाण्यासाठी वळसा घालून जावे लागणारे अंतर ४-५ किमी. अंतराने कमी होणार आहे. सध्या शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी या हीरान नदीत आपली वह्या-पुस्तके भांड्यांमध्ये टाकून पोहत शाळेत जातात.