सध्या तुरुंगवासात असलेले राष्ट्रीय जनता दलाचे संस्थापक लालूप्रसाद यादव यांची तब्येत बिघडल्याने, त्यांना उपचारांसाठी नवी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (एम्स) येथे आणले गेले होते. मात्र रुग्णालयात आरोग्य तपासणी दरम्यान ते दरम्यान “फीट” आढळल्याने त्यांना आज सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. अशी माहिती रुग्णालायतील सूत्रांकडून मिळाली आहे. तर, आरजेडीने मात्र या प्रकरणात राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला आहे. रूग्णालयातून डिस्चार्ज देण्याअगोदर लालू प्रसाद यादव यांना आपत्कालीन विभागात रात्रभर देखरेखीखाली ठेवण्यात आले होते, अशी देखील माहिती मिळाली आहे. "लालू प्रसाद यादव हे काल रात्री ९ वाजता रुग्णालयात आले आणि आपत्कालीन विभागात दाखल झाले. मात्र तपासणीनंतर ते तंदुरुस्त आढळल्याने त्यांना पहाटे साडेतीन वाजता डिस्चार्ज देण्यात आला. " सूत्रांनी एनडीटीव्हीला अशी माहिती दिली आहे. तर, " कुठे ना कुठे यामध्ये आमच्या नेत्यासोबत फार मोठे षडयंत्र रचलं जात आहे. आमच्या नेत्याची प्रकृती खराब आहे आणि तिथल्या मेडिकल बोर्डने दिल्लीत उपचार करण्याबाबत सूचवले होते. मात्र यामध्ये खूप मोठे राजकारण होत आहे. अशाप्रकारे एखाद्या व्यक्तीविरोधात राजकारण करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. " असं राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्याने म्हटलं आहे. लालूप्रसाद यांच्या प्रकृतीत बिघाड तथापि, आरजेडीने या प्रकरणी पक्षपातीपणाचा आरोप केला आहे आणि त्यांच्या डिस्चार्जच्या वेळेबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दोरंदा येथील कोषागारातून १३९ कोटींचा चारा घोटाळय़ाप्रकरणी दोषी ठरवत विशेष सीबीआय न्यायालयाने २१ फेब्रुवारी रोजी लालूप्रसाद यांना पाच वर्षांचा तुरुंगवास आणि ६० लाखांचा दंड ठोठावला आहे. त्यांना बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात ठेवले होते. त्यानंतर राजेंद्र इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये त्यांना उपचारार्थ हलवण्या आले आहे.