भारत आणि बांगलादेश यांच्यात जमीन हस्तांतरणासंबंधी करण्यात आलेला करार आसामसाठी फायदेशीर ठरेल, असे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी सोमवारी येथे सांगितले.सध्याच्या नकाशांनुसार आसाममधील सुमारे ६६५ हेक्टर्स जमीन बांगलादेशच्या ताब्यात असल्याचे दाखविण्यात आले आहे. या कराराची अंमलबजावणी झाल्यानंतर राज्याला त्या भागातील ३९७.५ हेक्टर्स जमिनीवर ताबा घेता येईल, याकडे गोगोई यांनी लक्ष वेधले.
 या करारातील तरतुदीनुसार बांगलादेशाच्या ताब्यात २६७.५ हेक्टर्स तर उर्वरित ३९७.५ हेक्टर्स जमीन आमच्या ताब्यात राहील, असे गोगोई यांनी नमूद केले. यामुळे नकाशात काहीही दाखविले असले तरी आसाम काहीही गमावणार नाही उलट आमच्याच पदरात काही पडणार आहे, असा दावा त्यांनी केला. यासंबंधीच्या विधेयकास विरोध करणारे भाजप व आसाम गण परिषदेवर गोगोई यांनी टीका केली.