नवी दिल्ली : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातील मोहीम तीव्र झाली आहे. पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसची दाणादाण उडत असून त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी, असे पत्र काँग्रेसचे नेते आशीष देशमुख यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिले आहे. काँग्रेसने एबी फॉर्म देऊनही उमेदवारी अर्ज न भरणाऱ्या सुधीर तांबेंवर निलंबनाची कारवाई झाली असली, तरी विधान परिषदेच्या उमेदवारीवरून झालेल्या गोंधळाचे प्रकरण पटोलेंनी नीट हाताळले नसल्याची भावना पक्षाच्या केंद्रातील वरिष्ठांमध्ये निर्माण झाली आहे. असे असताना आशीष देशमुख यांनी पटोलेंविरोधात पत्र लिहिल्यामुळे पटोलेंवरील पक्षांतर्गत दबाव वाढू लागला आहे. पटोले यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये नागपूरमध्ये विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. जून २०२२ मध्ये विधान परिषदेचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांना निवडून आणण्याचा पक्षश्रेष्ठींचा आदेश असतानाही ते पराभूत झाले. ४ जुलै रोजी शिंदे-फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावादिवशी काँग्रेसचे १० आमदार गैरहजर राहिले. नाना पटोले यांच्याकडे पक्षाने विश्वासाने प्रदेशाध्यक्षपदाची धुरा दिली होती. पण विदर्भासारखा बालेकिल्लाही काँग्रेसने गमावला आहे. भाजपच्या पाठिंब्यावर सत्यजित तांबेंसारखे अपक्ष विधान परिषदेच्या पाचही जागांवर निवडून आले तर विधान परिषदेच्या सभापतीपदाचा पेच निर्माण होईल. राज्यात काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकला गेला असून शिंदे गटामुळे तो पाचव्या क्रमांकावर जाईल. राहुल गांधी भारत जोडायला निघाले आहेत, पण स्थानिक नेते स्वत:ची सत्ता टिकवण्यासाठी धडपडत आहेत, अशी खरमरीत टीका देशमुख यांनी केली आहे. विधान परिषद निवडणूक रणनीतीसाठी आघाडीची आज बैठकमुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उद्या बुधवारी बैठक होत आहे. या बैठकीत नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवाराबाबतही अंतिम निर्णय होणार आहे.विधान परिषदेच्या पाच जागांमध्ये कोकण, नागपूर व औरंगाबाद या तीन शिक्षक मतदारसंघांचा आणि नाशिक व अमरावती पदवीधर मतदारसंघांचा समावेश आहे. नाशिक मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी दिलेले डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने मोठा घोळ निर्माण झाला. ही निवडणूक शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून लढविणार आहे.काँग्रेस उमेदवाराने ऐन वेळी दगाफटका दिल्यामुळे आघाडीच्या नेत्यांनी चर्चा करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे.