जयदत्त क्षीरसागर यांचा दणक्यात प्रचार बीड : ज्या दिव्यांना हात लावून सांभाळले, त्याच दिव्यांनी हात भाजल्यामुळे राजकीय निर्णय घ्यावा लागला. प्रत्येक निवडणुकीत सुपाऱ्या घेऊन तुताऱ्या वाजवणाऱ्या लोकांना जिल्ह्यातील जनतेने कधीच थारा दिला नाही. रखमाजी गावडे, कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे, केशरबाई क्षीरसागर, बबनराव ढाकणे या लोकांना निवडून देताना कधीच जात पाहिली नाही. जातीपातीच्या नावाने मतदान मागणे हा आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराची अनामत जप्त करा, असे आवाहन करीत जयदत्त क्षीरसागर यांनी भाजप प्रचाराला दणक्यात सुरुवात केली. बीड लोकसभा मतदार संघातील भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री पंकजा मुंडे यांची खालापुरी येथे सभा झाली. या वेळी राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार जयदत्त क्षीरसागर, आमदार भीमराव धोंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, रमेश पोकळे, सर्जेराव तांदळे आदी उपस्थित होते. जयदत्त क्षीरसागर भाजपच्या प्रचारात उतरतील, असे सांगण्यात येत होते. जाहीर प्रचारात त्यांनी सहभागी होऊ नये, असे राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, घरातील वादाला नेतृत्वाकडून मदत केली जात असल्याने जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपचा प्रचार करण्याचे ठरविले. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीकडून जातीचे राजकारण केले जात असल्याचे आवर्जून सांगितले. विरोधकांकडे विकासाचे कामच सांगायला नसल्यामुळे ते जातीचा प्रचार करत आहेत. मात्र, आपण जातीचे नव्हे तर मातीचे राजकारण करतो, असेही त्या म्हणाल्या. राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी भाजप महायुतीला पािठबा दिल्याच्या निर्णयाचे स्वागत करून हा तर ट्रेलर आहे, पुढे काय होते ते पाहा, अशा शब्दांत राष्ट्रवादीतून आणखी काही नेते येतील असे संकेत दिले. शेतकऱ्याचे पुत्र म्हणून राष्ट्रवादीचे उमेदवार मत मागत असले, तरी केज तालुक्यात शेतकऱ्यांच्या मापात काटा कोणी केला, असा टोला लगावत विकास करताना जात पाहिली नाही. त्यामुळे लोकांनी मत देताना जात पाहू नये, असे आवाहन केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर धोका देणाऱ्यांची स्पर्धा लावली, तर त्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे पहिला क्रमांक मिळवतील, असा टोमणाही मारला.