भावनाताई गवळी येथील खासदार आहेत, त्यांनी मतदारसंघासाठी अपेक्षित काम केले नाही, मतदार त्यांच्यावर नाराज आहे.. मोदी सरकारचे शेतीविषयक धोरण अपयशी ठरल्याची भावना आहे..पण पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशाला गरज आहे, सद्य स्थितीत देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे आणि यामुळेच भावनाताईंचा विजय होईल… यवतमाळ जिल्ह्यातील बस थांब्याजवळील चहाविक्रेता त्याचे मत सांगत होता.यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेच्या भावना गवळी, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, भाजपाचे बंडखोर पी बी आडे, वंचित आघाडीचे प्रा. प्रवीण कुमार हे रिंगणात आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील चार आणि वाशिम जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा यवतमाळ- वाशिम मतदारसंघात समावेश होतो. २० वर्षांपासून भावना गवळी या मतदारसंघाच्या खासदार आहे. यवतमाळमध्ये फेरफटका मारल्यास अनेक जण विद्यमान खासदारांवर नाराजी व्यक्त करतात. शेतकरी वर्गातही नाराजी दिसून येते. यवतमाळमध्ये कापूस, सोयाबीन अशी पीकं घेतली जातात. या मतदारसंघात सुमारे १८ लाख मतदार आहेत. यवतमाळध्ये १२ लाख आणि वाशिममध्ये सहा लाख मतदार आहेत.

(आणखी वाचा : आचारसंहिता म्हणजे काय? )

यवतमाळमधील जातीय समीकरणेही निवडणुकीत महत्त्वाची ठरतात. बंजारा, दलित, आदिवासी, मुस्लीम व मराठा या मतदारसंघात आहे. यातील बंजारा समाजाची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची ठरु शकते. आडे हे भाजपाचे बंडखोर उमेदवार असून ते भावना गवळी यांचे मत घेऊ शकतात. तसेच संजय राठोड यांची भूमिकाही महत्त्वाची ठरु शकते.

‘मातोश्री’च्या हस्तक्षेपानंतर शिवसेनेच्या या दोन स्थानिक नेत्यांमधील वाद मिटल्याचे सांगितले जात असले तरी अंतर्गत धूसफूस कायम असल्याची चर्चा आहे. काँग्रेससाठी डोकेदुखी म्हणजे मुस्लीम समाजातील तीन जणांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे आणि वंचित आघाडीचा उमेदवार यामुळे मतांचे विभाजन होऊ शकते. ‘प्रहार’च्या वैशाली येडे यांच्याविषयीही शेतकरी वर्ग आणि स्थानिकांमध्ये आकर्षण आहे. पण याचे रुपांतर मतदानात किती होईल, अशी शंकाही उपस्थित शहरातील ज्येष्ठ मतदार व्यक्त करतात.

(आणखी वाचा : NOTA : ‘नोटा’ म्हणजे काय, मतदानावेळी का वापरला जातो हा पर्याय? )

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यवतमाळमध्ये दीड लाखांहूव अधिक नवमतदार आहेत. सोशल मीडियामुळे या वर्गात मोदी अधिक लोकप्रिय आहेत. शहरातील एका तरुणाची प्रतिक्रिया महत्त्वाची होती. मोदी का आवडतात, असा प्रश्न विचारल्यास ते डॅशिंग पंतप्रधान असल्याचे तो सांगतो. “आमच्या काळात मोबाईल नव्हते. पण सध्याची पिढी मोबाईलवर जास्त असते. सोशल मीडियावर भाजपाने प्रभावीपणे प्रचार केला आहे. भावना गवळींवर स्थानिक नाराज असले तरी मोदींकडे पाहून तरुण नवमतदार भावना गवळींना मत देऊ शकतात”, असा अंदाज शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाने वर्तवला.