Maha Kumbh 2025 Flight Rates : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे आयोजित केलेल्या महाकुंभ मेळ्यासाठी देशभरातील भाविक पवित्र स्नानासाठी येत आहेत. मात्र, त्यांच्या प्रवास फार खर्चिक झाला आहे. हवाई मार्गे प्रयागराजला पोहोचण्यासाठी विमान कंपन्यांनी फ्लाईट्सचे दर अव्वासव्वा दराने वाढवले आहे. यावरून टीका झाल्यानंतर आता सरकारने हे दर कमी करण्याकरता पावले उचलली आहेत. नागरी उड्डान मंत्रालयाने सोमवारी सांगितले की प्रयागराजच्या फ्लाइटसाठी विमान भाडे तर्कसंगत करण्यासाठी पावले उचलली जात आहेत आणि महाकुंभच्या पार्श्वभूमीवर वाढती रहदारीची मागणी पूर्ण करण्यासाठी फ्लाइट्सची संख्या वाढवण्यात आली आहे.
तिकिट दर कमी करण्याच्या सूचना
१३ जानेवारीपासून महाकुंभला सुरुवात झाली असून २६ फेब्रुवारीपर्यंत महाकुंभ असणार आहेत. रेल्वेने आतापर्यंत या ठिकाणी ४८ लाख भाविकांनी नोंद केली. तर उर्वरित भाविक रस्तेमार्गे किंवा हवाईमार्गे प्रयागराज येथे पोहोचत आहेत. परंतु, हवाई मार्ग इतर मार्गांपेक्षा अधिक खर्चिक असून उड्डाणांच्या वाढत्या विमानभाड्यांबाबत विमान वाहतूक नियामक डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात विमान कंपनींच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घेतली. या बैठकीत तिकिट दर आणि उड्डाणांची संख्या वाढवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या, विविध भारतीय शहरांमधून प्रयागराजला जाण्यासाठी सुमारे १३२ उड्डाणे कार्यरत आहेत. प्रयागराज डिसेंबर २०२४ मध्ये १७ शहरांशी थेट जोडले गेले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, श्रीनगर आणि विशाखापट्टणमसह २६ शहरांमध्ये थेट आणि कनेक्टिंग फ्लाइट्स पोहोचल्याने, प्रयागराज आता भाविकांसाठी एक चांगले जोडलेले केंद्र आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नवीन उड्डाणे ही प्रादेशिक कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी आणि महाकुंभ कालावधीत प्रयागराजला येणाऱ्या प्रवाशांना सामावून घेण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
विमान फेऱ्या वाढवण्याचे आवाहन
पुढे, मंत्रालयाने सांगितले की या उड्डाणे जोडण्यामुळे विमान भाड्यांवरील दबाव कमी होईल आणि भाविक व पर्यटकांसाठी एकूण प्रवेशयोग्यता सुधारेल. नागरी उड्डान मंत्री के. राम मोहन नायडू यांच्या निर्देशानुसार, सणवार जवळ येत असताना विशेषत: आगामी शाही स्नान दरम्यान २९ जानेवारी, ३ फेब्रुवारी, आणि ४ फेब्रुवारी, १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या इतर महत्त्वाच्या स्नानादरम्यान विमान भाडे नियंत्रणात राहतील याची खात्री करण्यासाठी आणि विमानाच्या फेऱ्या वाढवण्याच्या सल्ला दिला आहे. सध्याच्या नियमांनुसार, विमान भाडे नियंत्रणमुक्त आहे आणि सरकारचे नियंत्रण नाही.
अकासा एअर २८ आणि २९ जानेवारीला अहमदाबादहून प्रयागराजसाठी उड्डाणे सुरू करेल. फेब्रुवारीमध्ये, एअरलाइनने अहमदाबादहून ९ उड्डाणे आणि बेंगळुरू ते प्रयागराजपर्यंत १२ उड्डाणे चालवण्याची योजना आखली आहे. स्पाइसजेट दिल्ली, चेन्नई, गुवाहाटी, बेंगळुरू, अहमदाबाद, मुंबई, जयपूर आणि हैदराबाद येथून प्रयागराजसाठी उड्डाणे सुरू करणार आहे. यामध्ये फेब्रुवारीमध्ये सुमारे ४३ हजार जागांची भर पडेल, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.