केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भगवद्गीता हा राष्ट्रीय ग्रंथ करण्याचा प्रस्ताव एका खासगी कार्यक्रमात मांडल्यानंतर संसदेत त्यावर सडकून टीका झाली, आता भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी लोकांना रामायण व महाभारत वाचण्याचा सल्ला दिला आहे. ही दोन्ही महाकाव्ये म्हणजे राजकीय व नैतिक ज्ञानाचा मोठा साठा आहे, असे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले.
स्वातंत्र्यपूर्व काळातील आठवणी सांगताना ते म्हणाले की, आपल्या आजीने महाभारत टप्प्याटप्प्याने वाच असे सुचवले होते, कारण ते घरात ठेवणे योग्य नसल्याची समजूत त्या काळी होती, पण आपल्या मते महाभारतासारखे दुसरे अध्यापनशास्त्र नाही किंवा ज्ञानाचा साठा नाही. त्यात राजकारण व नैतिक शिकवण आहे. ती एकता व धैर्याची आहे.
अडवाणी म्हणाले की, आपण ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकलो त्यामुळे आपल्याला फक्त सिंधी ही मातृभाषा माहीत होती व इंग्रजी येत होते. महाभारत व रामायण तसेत भगवद्गीता आपण सिंधी व इंग्रजीत वाचली. एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात अडवाणी बोलत होते, त्यात माध्यमरत्न पुरस्कार देऊन पीटीआयचे संपादक अजय कौल, दूरदर्शन दिल्लीचे गिरीश निशाना व लोकसभा टीव्हीचे ग्यानेंद्र पांडे, अरविंद सिंग (राज्यसभा टीव्ही), सुमीत अवस्थी (आयबीएन ७), दिलबार गोथी (नवभारत टाइम्स), प्रशात मिश्रा (दैनिक जागरण), शेखर घोष (दैनिक भास्कर), रेडिओ जॉकी नावेद (रेडिओ मिर्ची), रौनक (रेड एफएम) यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.