शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासहित पक्षातील बंडखोर तसंच अपक्षा आमदारांनी गुवाहाटीमधील कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आहे. एकनाथ शिंदे उद्या आमदारांसहित मुंबईसाठी रवाना होणार असून त्याआधी त्यांनी देवीचं दर्शन घेतलं. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला. तसंच मुंबईत आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाणार असल्याचंही म्हटलं आहे.

विश्वासदर्शक ठरावाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात; म्हणाले “६ वाजले तरी चालतील पण आजच सुनावणी घ्या”, कोर्टाकडून मागणी मान्य

“आम्ही श्रद्धेने कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आहे. एक वेगळा आनंद, समाधान सर्व आमदारांना मिळालं आहे. कोणत्याही आमदारावर जबरदस्ती केल्याचं तुम्ही इथे पाहिलं का? सर्वजण मोकळेपणाने फिरत होते,” असं सांगत एकनाथ शिंदे यांनी आरोप फेटाळून लावले.

पुढे बोलताना म्हणाले की, “उद्या आम्ही सर्व आमदार मुंबईत पोहोचणार आहोत. आमच्याकडे ५० लोक असून बहुमत आहे. आमच्या गटाकडे बहुमत आहे त्यामुळे आम्हाला बहुमत चाचणीची चिंता नाही. जी प्रक्रिया असेल त्यात आम्ही जिंकू. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. लोकशाहीत क्रमांक आणि बहुमताला महत्व असतं. या देशात संविधान, कायदा आणि नियमाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही”.

यावेळी त्यांना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरही जाणार, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर आनंद दिघेंनाही वंदन करणार. ही बाळासाहेब ठाकरेंची, हिंदुत्वाला पुढे नेणारी, आनंद दिघेंचं विचार पुढे नेणारी शिवसेना आहे. महाराष्ट्र हे जनतेचं राज्य असून त्याचा विकास करण्यासाठी, प्रगतीपथावर नेण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना हा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे नेत आहे”.