ज्या व्यक्ती घटनात्मक पदे भूषवीत आहेत त्यांनी घटनेचे पावित्र्य अबाधित ठेवले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी मंगळवारी येथे केले. राज्यपालांच्या भूमिकेवरून सध्या देशात वाद निर्माण झाले असल्याच्या पाश्र्वभूमीवर मुखर्जी यांनी राज्यपालांच्या परिषदेत हे आवाहन केले.
स्वातंत्र्यापासून आपला देश उत्तरोत्तर प्रगती करीत आहे, आपल्या घटनेत नमूद करण्यात आलेल्या तत्त्वांचा आदर केल्यानेच आपण येथपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे ज्या व्यक्ती घटनात्मक पदे भूषवीत आहेत त्यांनी घटनेचे पावित्र्य अबाधित ठेवले पाहिजे, असेही राष्ट्रपती म्हणाले.
अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल जे. पी. राजखोवा यांच्या भूमिकेमुळे त्या राज्यात अनेक घडामोडी घडल्या आणि त्यानंतर तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्या पाश्र्वभूमीवर मुखर्जी यांच्या आवाहनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
परकीय शक्तींचा हात असल्याचे स्पष्टपणे सिद्ध करणारे दहशतवादी हल्ले देशावर गेल्या वर्षी करण्यात आले. जे आंतरराष्ट्रीय प्रश्न प्रलंबित आहेत ते चर्चेद्वारे सोडविण्याचे देशाकडून प्रयत्न केले जात आहेत. आर्थिक मंदी, हवामान बदल अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय सीमेवरील राज्यांवर होत असलेले दहशतवादी हल्ले, अशा आव्हानांचा मुकाबला करावा लागत आहे, असेही ते म्हणाले.