गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूतील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या शशिकला परिवाराला मंगळवारी मोठा धक्का बसला. शशिकला यांचे पुतणे टी. दिनकरन आणि त्यांच्या परिवाराची अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाने घेतला. तामिळनाडूचे मंत्री डी. जयकुमार यांनी ही घोषणा केली. याशिवाय, पक्षाचे पुढील ध्येयधोरण निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता दिनकरन आणि त्यांच्या कुटुंबियांना पक्ष व सरकारमधून दूर ठेवण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांसह अण्णाद्रमुकचे आमदार आणि खासदार या सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतल्याचे डी. जयकुमार यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून अण्णाद्रमुकच्या सत्ताधारी गट (अण्णाद्रमुक-अम्मा) आणि ओ. पनीरसेल्वम नेतृत्त्व करत असलेल्या बंडखोर गटात (अण्णाद्रमुक- पुरात्ची थलैवी अम्मा) चर्चा सुरू आहे. हे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. मात्र, पनीरसेल्वम यांनी अण्णाद्रमुकच्या महासचिव व्ही.के. शशिकला आणि त्यांचे पुतणे दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी सुरूवातीपासून लावून धरली आहे. त्यामुळे अण्णाद्रमुककडून आज घेण्यात आलेला निर्णय एकप्रकारे पनीरसेल्वम यांची सरशी मानला जात आहे.

दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने दिनकरन यांच्याविरोधात निवडणूक अधिकाऱ्याला लाच दिल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पक्षाचे चिन्ह मिळावे यासाठी त्यांनी अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न केला होता. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आरके नगर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत निवडणूक आयोगाने एआयएडीएमकेचे चिन्ह ‘दोन पान’ जप्त केले होते. हे चिन्ह आपल्याला मिळावे यासाठी दिनकरन यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना तब्बल ५० कोटी रुपयांची लाच देण्याची दर्शवली होती. यासाठी दिनकरन यांनी सुकेश चंद्रशेखर या दलालाची मदत घेतली होती. दिल्ली पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी सुकेशला अटक केली. सुकेशकडून १.३ कोटी रुपये आणि दोन महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

आरके नगर पोटनिवडणुकीत निवडणूक आयोगाने शशिकला यांच्या गटाला ‘ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम अम्मा’ (एआयएडीएमके) हे नाव दिले होते. तर पन्नीरसेल्वम गटाला ‘एआएडीएमके पुराट्ची थलैवी अम्मा’ नाव दिले होते. दोन्ही गटांनी पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘दोन पान’वर दावा केला होता. या वादावर निकाल देताना निवडणूक आयोगाने शशिकला गटाला ‘टोपी’ तर पन्नीरसेल्वम गटाला ‘विजेचा खांब’ हे निवडणूक चिन्ह दिले होते. आरके नगरमध्ये १२ एप्रिलरोजी निवडणूक होणार होती. मात्र या निवडणुकीत मतदारांना लाच दिल्याचे समोर आल्याने निवडणूक रद्द करण्यात आली होती.