महाराष्ट्रातील विशेष न्यायालयाला २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल एस. पी. पुरोहित व साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह इतर आरोपींच्या जामीन अर्जावर निर्णय घेण्यासाठी आणखी दोन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे.
न्या. ए. एम. सप्रे व न्या. जे. चेलमेश्वर यांनी सांगितले, की विशेष न्यायालयास दोन महिने मुदतवाढ दिली जात आहे. अतिरिक्त अधिवक्ता तुषार मेहता यांनी एमसीओसीए न्यायालयाच्या अधिकाऱ्यांनी दोन महिने मुदतवाढ मागितली आहे, कारण नवीन न्यायाधीशांनी नुकताच कार्यभार स्वीकारला आहे, त्यामुळे जामिनावर निर्णय घेण्यास आणखी दोन महिने देण्यात यावेत.
न्यायालयाने सांगितले, की १५ एप्रिल रोजी आम्ही एक आदेश दिला होता, त्यात जामीन याचिका वेळेत म्हणजे न्यायाधीशाने पदग्रहण केल्यानंतर एक महिन्यात निकाली काढण्याचे म्हटले होते. राकेश धावडे याच्यावर परभणी व जालना प्रकरणातही आरोप आहेत, त्यामुळे तो सोडून इतर आरोपींचा जामीन विचारात घेताना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (एमसीओसीए)च्या कलमानुसार विचार करण्याची गरज नाही. धावडे याचा परभणी व जालना स्फोटात हात असल्याची पुरेशी शंका आहे, त्यामुळे त्या प्रकरणात जामीन देताना या कायद्याच्या तरतुदींचा विचार करावा लागेल. विशेष न्यायालयाने तातडीने सुनावणी सुरू करावी, कारण हे प्रकरण २००८ पासूनचे आहे, त्यामुळे सात वर्षे गेली आहेत. आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.