काँग्रेस नेतृत्वावरून गेल्या काही दिवसात पक्षात अंतर्गत वाद सुरु आहेत. काँग्रेस पक्षाच्या जी-२३ नेत्यांनी मागच्या वर्षी सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेतृत्व बदलाच्या सूचना केल्या होत्या. त्यावरून काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या नेत्यांना खडे बोल सुनावले.  जी २३ मधील नेते करोनाकाळात बेपत्ता होते, अशी बोचरी टीका त्यांनी केली. “या नेत्यांना काँग्रेस पक्ष उद्ध्वस्त करण्याचा अधिकार नाही. या नेत्यांना काँग्रेस पक्षानं खूप काही दिलं आहे.”, असं त्यांनी यावेळी सांगितलं. यावर जी २३ मधील काँग्रेस नेत्यांनी पलटवार करत खरगेंना सुनावलं आहे.

काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी काही दिवसांपूर्वी डिनरचं आयोजन केलं होतं. यात जी २३ मधील नेत्यांनी हजेरी लावली होती. खरगेंच्या विधानानंतर  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी कानपिचक्या दिल्यात. “राजकारणात येण्यापूर्वी विचार करायला हवा आणि बोलण्यापूर्वी चिंतन करायला हवं.”, असा सल्ला सिब्बल यांनी दिला. “लोकांनी पक्ष उद्ध्वस्त करण्याचा विचार करू नये, जे असं म्हणतात ते विसरतात की ते ज्या लोकांबद्दल बोलत आहेत, त्यांनी आपले सर्वस्व पक्षाला दिले आहे. पक्ष घडवण्यासाठी योगदान दिले होते आणि काही लोकांनी सोनिया गांधींच्या काळात पक्ष सोडला होता.”, याकडेही कपिल सिब्बल यांनी लक्ष वेधलं. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्यांनी आपली बाजू मांडली.”आम्ही सर्वजण आपल्या मताशी ठाम आहोत. आपल्या सर्वांना पक्षाला बळकटी द्यायची आहे. पक्ष मजबूत झाल्यास देशाला संकटातून वाचवता येईल. सर्वांना सकारात्मक बदल हवा आहे.”, असंही कपिल सिब्बल यांनी सांगितलं.

भाजपा राणेंच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नाही पण…; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

“मी आयुष्यभर काँग्रेससोबत आहे. काँग्रेसच्या विचारधारेवर आणि मूल्यांवर विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे. मला काँग्रेस अध्यक्षांबद्दल आदर आहे. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी मी आव्हानं स्वीकारण्यास तयार आहे.”, अंसं काँग्रेसचे राज्यसभा खासदार आनंद शर्मा यांनी सांगितलं.

“हिंदुत्वाशी गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं,” नारायण राणेंची पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीका

दुसरीकडे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी खरगे यांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. “वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांच्या मतांचा आदर केला पाहीजे. खरगेंबद्दल मला आदर आहे. आम्ही सर्वजण पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जेणेकरून राष्ट्रीय स्तरावर भाजपाशी लढा देता येईल”, असं शशी थरूर यांनी सांगितलं. काँग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी यांनीही मल्लिकार्जुन विधानावर आपलं मत व्यक्त केलं आहे. “आम्हाला मल्लिकार्जुन खरगेंचा आदर आहे. कपिल सिब्बल यांच्या घऱी आयोजित केलेल्या डिनर पार्टीत काँग्रेसबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेबाबत बोलायचं झालं तर, खरगेंनी माझ्याशी बोलायला हवं होतं. मी त्यांना याबाबत माहिती दिली असती.”, असं मनिष तिवारी यांनी सांगितलं.