पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी पश्चिम बंगालचा प्रस्तावित देखावा वगळण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. “कोणतीही कारण किंवा औचित्य न सांगता देखावा नाकारण्यात आला, हे आमच्यासाठी खूप धक्कादायक आहे. या निर्णयामुळे मला खूप धक्का बसला असून दुःख झालंय,” असे ममता यांनी म्हटलंय. हा प्रस्तावित देखावा नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या भारतीय राष्ट्रीय सैन्याच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ होती. या देखाव्यात विद्यासागर, रवींद्रनाथ टागोर, विवेकानंद, चित्तरंजन दास, श्री अरबिंदो, मातंगिनी हाजरा, बिरसा मुंडा, नजरुल इस्लाम, ममता यांनी लिहिलेली चित्रे असणार होती. “केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पश्चिम बंगालमधील लोक खूप दुःखी झाले आहेत. दरम्यान, बंगाल भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आघाडीवर असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. तसेच बंगालने फाळणीच्या काळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वात मोठी किंमत मोजली आहे,” असं त्यांनी म्हटलंय. "आपल्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाच्या समारंभात आपल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांच्या या योगदानाला स्थान मिळत नाही हे धक्कादायक आहे," असे ममता बॅनर्जी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.