तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी दावा केला आहे की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी मोठ्या गेम चेंजर ठरणार आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी यापूर्वी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी काँग्रेसमधून तृणमूलमध्ये प्रवेश केला. आसनसोलमधून लोकसभा पोटनिवडणुकीत सिन्हा यांनी विजय मिळवला आहे.लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ममता बॅनर्जींमुळे मी खूप प्रभावित झालो आहे, असे शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे. आपल्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, मी मित्र राजेश खन्ना यांच्या विरोधात पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी याबाबत ही प्रतिक्रिया दिली आहे. ममता बॅनर्जी अशा नेत्या आहेत ज्यांचा सर्वांना आदर आहे. २०२४ मध्ये त्यांची भूमिका दुर्लक्षित करता येणार नाही. या महिन्यात शत्रुघ्न सिन्हा यांनी आसनसोल मतदारसंघातून भाजपाच्या अग्निमित्रा पॉल यांचा ३ लाखांहून अधिक मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे. या जागेवर तृणमूलने यापूर्वी कधीही निवडणूक जिंकली नव्हती. सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मी राजकारणात आलो. जयप्रकाश नारायण यांचा माझ्यावर खूप प्रभाव होता. भाजपा सोडून काँग्रेस आणि नंतर तृणमूलमध्ये येण्याबाबत ते म्हणाले की, “आता भाजपामध्ये लोकशाही नाही तर हुकूमशाही चालते. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचा लोकशाहीवर विश्वास होता. आज भाजपा केवळ पंतप्रधानांच्या सूचनांचे पालन करते.” शत्रुघ्न सिन्हा हे वाजपेयी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. “मी पहिली निवडणूक लालकृष्ण अडवाणींच्या सांगण्यावरून लढलो. ते माझे राजकीय गुरू आहेत. मी पहिली निवडणूक माझा मित्र राजेश खन्ना विरुद्ध लढलो. ते काँग्रेस पक्षाकडून उभे होते. ती पोटनिवडणूक होती. मला ही निवडणूक लढवायची नव्हती पण लालकृष्ण अडवाणींनी तसे करण्यास सांगितले,” असे सिन्हा म्हणाले.