देशाची सेवा करणे म्हणजे मार्ग भरकटणे असेल तर आता जनताच ठरवेल की कोण रस्ता भरकटला आहे असे प्रत्युत्तर प्रियांका गांधी यांना वरुण यांच्या आई मनेका गांधी यांनी दिले आहे. वरुण गांधी हा माझा भाऊ असला तरी राजकारणात त्याने चुकीचा मार्ग निवडला असून आता जनताच त्याला योग्य रस्त्यावर आणेल अशा शब्दांत प्रियंका गांधी – वड्रा यांनी वरुण गांधींवर टीका केली होती.  
उत्तरप्रदेशमधील सुलतानपूर येथून निवडणूक लढवणा-या वरुण गांधींच्या विरोधात निवडणूक लढवणा-या काँग्रेसच्या उमेदवार अमिता सिंह यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत प्रियंका गांधींनी प्रथमच वरुण गांधींवर टीका केली. वरुण गांधी हा चुकीच्या मार्गावर असून जेव्हा एखादा व्यक्ती चुकीच्या मार्गावर असेल तर जनतेची विवेकबुध्दी त्याला पुन्हा योग्य मार्गावर आणेल. त्यामुळे जनतेने आता वरुण गांधींना पराभूत करावे असे आवाहन प्रियंका गांधींनी केले आहे.