दहशतवादाच्या प्रत्येक लहानसहान घटनांकडेही युद्ध म्हणूनच बघितले गेले पाहिजे, असे वक्तव्य केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केले. ते बुधवारी लोकसभेत पठाणकोट हल्ल्यासंदर्भातील चर्चेदरम्यान बोलत होते. यावेळी पर्रिकरांनी आम्ही भारताच्या शत्रुंना सहीसलामत जाऊ देणार नाही, असे सांगितले. या सगळ्याकडे युद्ध म्हणूनच बघितले पाहिजे. लहानात लहान दहशतवादी कृत्याकडेही युद्ध म्हणूनच पाहिले पाहिजे. प्रसारमाध्यमांनीही एखाद्या लष्करी मोहीमेबद्दल सतत माहिती पुरवत राहणे चुकीचे आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलांसाठी धोकादायक निर्माण होऊ शकते, असेदेखील पर्रिकरांनी म्हटले. भारतीय सैन्याच्या तावडीतून शत्रू सहीसलामत सुटणार नाही, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पर्रिकरांनी पठाणकोट हल्ल्याच्यावेळी त्यांच्या ट्विटर अकांटवरून देण्यात आलेल्या चुकीच्या माहितीबद्दलही स्पष्टीकरण दिले. त्यावेळी एक लहानशी चूक घडली होती. मात्र, ती तातडीने दुरूस्त करण्यात आली होती, असे त्यांनी म्हटले. २ जानेवारील पठाणकोट हल्ल्याच्यावेळी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील पाचही दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती दिली होती. मात्र, काही वेळातच हे त्यांनी या विधानावरून माघार घेतली होती.