गेल्या दीड वर्षापासून करोनामुळे प्रत्येकाचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. करोनाला रोखण्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग आणि हात स्वच्छ धुणे या गोष्टीं सातत्याने पाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यामुळे आता या सर्व गोष्टी आपल्या जीवनाचा एक भाग बनल्या आहेत. करोनावरील लस घेऊन लोक स्वतःचे रक्षण करत आहेत. मात्र लसीकरणानंतरही संसर्ग रोखण्यासाठी सर्व गोष्टी पाळण्याचा सल्ला तज्ञांमार्फत देण्यात येत आहे. त्यामुळे मास्कपासून सुटका कधी असा प्रश्न लोकांकडून वारंवार विचारला जात आहे. लोकांना मास्कशिवाय ते कधी फिरू शकतील हे जाणून घ्यायचे आहे. दरम्यान आता नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

व्ही के पॉल यांच्या मते, करोनावर मात करण्यासाठी लस, औषध आणि करोना निर्बंधाचे योग्य पालन करणे आवश्यक आहे. जर करोनाचा पराभव करायचा असेल तर या सर्व गोष्टी एकत्र पाळाव्या लागतील, त्यामुळे पुढच्या वर्षापर्यंत भारतातील लोकांना मास्कचा वापर करावा लागेल. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पॉल यांनी इशारा दिला आहे आणि म्हटले आहे की तिसऱ्या लाटेची शक्यता अद्याप टळली नाही, पुढील काळ धोकादायक आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत डॉ. व्ही. के. पॉल यांनी, “मास्कपासून सध्यातरी सुटका होणार नाही. आपल्याला पुढील वर्षातही मास्क घालणे सुरू ठेवावे लागेल,” असे म्हटले आहे.

भारतात कोरोनाची तिसरी लाट येईल का? याबाबतही पॉल यांनी भाष्य केलं आहे. हे नाकारता येणार नाही. पुढील चार-पाच महिन्यांत लसीकरणामुळे हर्ड इम्युनिटी तयार होऊ शकते. महामारीपासून वाचण्यासाठी आपल्याला स्वतःला तयार करावे लागेल आणि मला वाटते की जर आपण एकत्र आलो तर ते शक्य होईल, असे डॉ. पॉल यांनी म्हटले आहे.

पॉल यांनी जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हॅक्सिनला मंजुरी देण्याच्या स्थितीचा संदर्भातही प्रतिक्रिया दिली आहे. भारतात विकसित झालेल्या कोविडविरोधी लसींबाबत जागतिक आरोग्य संघटना यासाठी सकारात्मक प्रतिसाद देईल आणि तेही या महिन्याच्या अखेरीस असे पॉल यांनी म्हटले.