बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सर्वेसर्वा मायावती यांनी महात्मा जोतिबा फुले आणि काशीराम यांना भारतरत्न किताब देण्याची मागणी केली. त्या शनिवारी लखनऊ येथील पत्रकारपरिषदेत बोलत होत्या. यावेळी मायावती यांनी भाजपवर जातीयवादी असल्याचा आरोप करत जोरदार हल्ला चढवला. भाजपने एकाच वेळी एकाच जातीच्या दोन व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार घोषित केला. मात्र दलित किंवा इतर मागास समाजातील कोणत्याही व्यक्तीचा विचार यावेळी सरकारने केलेला नसल्याचे मायवतींनी म्हटले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर दलितांसाठी काम करणाऱ्या काशीराम यांच्या योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न मिळायला हवा होता. तसेच महाराष्ट्रात मागासवर्गीयांच्या शिक्षण आणि समानतेसाठी जोतिबा फुले यांनी केलेले कार्य ध्यानात घेऊन त्यांचाही भारतरत्न पुरस्काराने सन्मान केला पाहिजे, असे मत मायावतींनी व्यक्त केले.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय यांना २५ डिसेंबर २०१४ रोजी भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २६ जानेवारी रोजी त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात येईल.