संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) गतवर्षीच्या वर्धापनदिन हजर राहून प्रगतीपुस्तक सादर करणारे समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंहांनी या वर्षीच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. द्रमुकचे टी. आर. बालू, तृणमूलचे सौगाता रॉय यांनी यूपीएच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती न लावल्याने आघाडीच्या राजकारणाची दुर्दशा समोर आली.
लोकसभेत ५८ सदस्य संख्या असलेल्या पक्षांच्या या महत्त्वाच्या नेत्यांच्या गैरहजेरीमुळे सरकारचे पंगुत्व उघड झाले. निवडणुकीच्या वर्षात अर्थव्यवस्थेच्या पुनरूज्जीवनासाठी ठोस भूमिका घेताना सरकारला ब-याच अडथळ्यांना सामोरे जावे लागणार आहे, हे स्पष्ट झाले. मात्र, जुनीच घोकंपट्टी करत मायावतींनी लोकसभा निवडणुकांपर्य़ंत मनमोहनसिंग सरकारला बाहेरून पाठिंबा कायम ठेवणार असल्याचे सांगितले. या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला राज्यसभा सदस्य सतीश मिश्रा व ब्रजेश पाठक बसपचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. परंतु, बसपचे हे दोन्ही नेते सरकारच्या प्रगतीपुस्तकाच्या प्रकाशनवेळी अनुपस्थित राहिले. मागील वर्षी बसप या सोहळ्यात सहभागी झाला नव्हता.
द्रमुकने व तृणमूल कॉंग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यानंतर बसपच्या २१ खासदारांच्या बळावर यूपीए सरकार तग धरून आहे. बसप, लालूप्रसाद आणि रामविलास पासवान यांनी यूपीएच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यामुळे मुलायमसिंह यादव आले नाहीत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कॉंग्रेसला अंतर देत समाजवादी पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मुलायमसिंह यादवदेखील पंतप्रधान पदासाठी उत्सुक असल्याचा संदेश दिला आहे.