काँग्रेसच्या मेघालयमधील १७ पैकी १२ आमदारांनी गुरुवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. देशातील ‘विभाजक शक्तींना’ तोंड देण्यात काँग्रेसला अपयश आल्याचा ठपका या आमदारांचे नेते मुकुल संगमा यांनी ठेवला. बंडखोर आमदारांच्या या निर्णयामुळे, आतापर्यंत राज्यात अस्तित्व नसलेला ममता बॅनर्जी यांचा पक्ष आघाडीचा विरोधी पक्ष ठरला आहे. दरम्यान मुकूल संगमा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना पक्ष निडणुकीच्या रिंगणात जिंकण्याच्या उद्धेशाने उतरत नाही असं सांगत नाराजी जाहीर करत काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या कारणांचा उलगडा केला. "काँग्रेस जिंकण्याच्या हेतूने निवडणुकीच्या रिंगणात उतरत नाही. चलता है अशा वृत्तीने ते जातात," असं सांगत मुकूल संगमा यांनी गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचं उदाहरण दिलं. काँग्रेस अनेक राज्यात कमकुवत झाली असून पुन्हा नव्याने उभं होण्यासाठी कोणतीही योजना नसल्याचंही ते म्हणाले आहेत. "पक्षातीत अनेक ज्येष्ठ नेत्यांनी नेतृत्वाशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र काही फायदा झाला नाही. मी प्रयत्न केले नाहीत अशातलीही गोष्ट नाही. मी एकामागून एक अनेक प्रयत्न केले," असं मुकूल संगमा यांनी सांगितलं. तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी आपण अनेकदा चर्चा केल्याचा खुलासाही त्यांनी केला. "आम्हीदेखील आमच्या बाजूने थोडा अभ्यास करुन इतर कोणासोबत जाणं शक्य आहे का याची पडताळणी केली. नंतर प्रशांत किशोर यांनी समोर असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या पर्यायाकडे पाहिलं पाहिजे असं सुचवलं," अशी माहिती संगमा यांनी दिली. दरम्यान या घडामोडीमुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आधीच असलेल्या ‘जायंट किलर’ या प्रतिमेला आणखी बळ मिळाले आहे. नजीकच्या भविष्यकाळात बंगालमध्ये सत्तेवर येण्याची भाजपाची महत्त्वाकांक्षा त्यांनी धुळीला मिळवली होती; तसेच प्रशांत किशोर यांची प्रभावी निवडणूक रणनीतीकार ही प्रतिमाही बळकट केली होती. आपली निष्ठा बदलण्याच्या निर्णयाचे मूळ, अधिकाधिक बळकट होणाऱ्या भाजपाशी लढा देण्यातील काँग्रेसच्या अपयशात असल्याचे संगमा यांनी सांगितले. २०१० ते २०१८ या कालावधीत ते मेघालयचे मुख्यमंत्री होते.