काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात रात्रभराच्या गोळीबारानंतर दहशतवाद्यांना मारण्यात भारतीय सुरक्षा दलाला यश मिळाल्याचे वृत्त पोलिसांनी दिले आहे. एके रायफल आणि काही शस्त्रसाठ्यासह अतिरेक्यांचे देह ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. श्रीनगरपासून ३५ किलोमीटरवर असणा-या पुलवामा जिल्ह्यातील कंगन गावात दहशतवादी असल्याची माहिती शुक्रवारी भारतीय सुरक्षा दलांना मिळाली होती. लष्कराचे जवान आल्याचे समजताच दहशतवाद्याने सुरक्षापथकांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. सुरक्षापथकांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दहशतवादी जखमी झाला होता. त्यानंतर शुक्रवारी रात्री सुरक्षा दलांनी कारवाई स्थगित केल्यानंतर शनिवारी सकाळी मृत दहशतवाद्यांचे देह ताब्यात घेण्यात आले आहेत. दरम्यान या दहशतवाद्यांची आणि त्यांच्या संबधीत संघटनेची ओळख पटल्याची माहिती पोलीस प्रवक्त्यांकडून देण्यात आलेली नाही.