इस्लामाबाद : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराची पाकिस्तानात घुसखोरी अटळ आहे असा दावा त्यांचे संरक्षणमंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला. यासंबंधी भारताकडून सातत्याने वक्तव्ये केली जात आहेत आणि पाकिस्तानच्या लष्कराने सरकारला संभाव्य भारतीय हल्ल्याची माहिती दिली आहे असे ते पुढे म्हणाले. मात्र, आपल्या विधानामागील कोणतेही कारण त्यांनी दिले नाही.
भारतीय लष्कर पाकिस्तानमध्ये घुसण्याची तयारी करत असताना आम्ही जादा कुमक पाठवत आहोत. अशा परिस्थितीत काही सामरिक निर्णय घ्यावे लागतात, त्यामुळे हे निर्णय घेण्यात आले आहेत असे ख्वाजा आसिफ म्हणाले. त्यांच्या इस्लामाबादमधील कार्यालयातून ते बोलत होते. आसिफ यांच्या वक्तव्यावर भारताच्या संरक्षण मंत्रालयाने किंवा परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
आमच्या अस्तित्त्वाला थेट धोका असेल तरच आम्ही अण्वस्त्राचा वापर करू असे म्हणत हा पर्याय खुला असल्याची गर्भित धमकीही ख्वाजा आसिफ यांनी दिली. भारताबरोबरच्या तणावाबद्दल आम्ही आखाती देश, चीन या मित्र देशांसह ब्रिटन, अमेरिका आणि अन्य राष्ट्रांशी चर्चा केली आहे असे त्यांनी सांगितले. काही आखाती देशांनी दोन्ही बाजूंशी चर्चा केली आहे अशी माहिती त्यांनी दिली. सिंधू जलकरार स्थगित करण्याचा भारताचा निर्णय ही युद्धाची कृती असल्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेचा ख्वाजा आसिफ यांनी पुनरुच्चार केला.
राजनाथ सिंह यांची पंतप्रधानांशी चर्चा
नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीची माहिती दिली असे या बैठकीची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. ही चर्चा सुमारे ४० मिनिटे चालली.