हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार झाले आहेत. पोलीस एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पोलिसांनी बंदूक हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. यावर आता सर्वच स्तरातून निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहे. याघटनेला एमआयएमचे प्रमुख अससुद्दीन ओवैसी यांनी विरोध करत पोलिसांच्या चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
यापूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वकील वृंदा ग्रोवर यांनी ही चकमक चुकीची असून पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता ओवैसी यांनी याप्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे या चकमकीचाही तपास झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नावाचाही उल्लेख केला. हे लोकं जनावरासारखे झाले आहेत. यावर तात्पुरता उपाय करायला नको. महिलांच्या सुरक्षेसाठी अनुकुल वातावरण तयार करण्याची आवश्यकता आहे असं यापूर्वी मुख्यमंत्री म्हणाले असल्याचं औवेसी यांनी सांगितलं.
हैदराबाद पोलिसांची चंबळच्या डाकुंशी तुलना
मुळात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींच्या हातात बेड्या असतात. त्या असतानाही त्यांनी शस्त्र हिसकावून घेतली असं गृहित धरलं तरी हा गोळीबार योग्य नव्हता. झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणं स्वाभाविक आहे. पण तसा न्याय चंबळचे दरोडेखोरही द्यायचे. पण शेवटी ते दरोडेखोरच होते, असंही ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.
चकमक करण्याची पद्धत चुकीची – अंजली दमानिया
या घटनेनंतर द्विधा मनस्थिती आहे. बलात्कारी ठार झाल्याचा आनंद आहे, परंतु कायदेशीर मार्गाने फाशी व्हायला पाहिजे होती. चकमक करण्याची पद्धत चुकीची आहे, असं मत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या.
नेमकं काय झालं ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना तपासासाठी घटनास्थळी नेण्यात आलं होतं. यावेळी आरोपींनी पोलिसांवर हल्ला करत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. चौघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केलं, अशी माहिती सायबरादाबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण ?
तेलंगणची राजधानी असलेल्या हैदराबाद येथे महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर हत्या आणि नंतर मृतदेह जाळून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली होती. आरोपींची चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे केले होते.

