एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भारतातील मुस्लिमांच्या स्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. “देशात ज्या ठिकाणी भाजपाचे सरकार आहे, त्या ठिकाणी मुस्लीम लोक खुल्या तुरुंगात आयुष्य घालवत असल्याचं वाटत आहे”, असे ओवैसी यांनी म्हटले आहे. या देशात रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना जास्त मान आहे पण मुस्लिमांना नाही, असा संताप त्यांनी सभेत बोलताना व्यक्त केला. गुजरातमधील दांडिया कार्यक्रमादरम्यान मुस्लीम तरुणांना झालेल्या मारहाणीचाही ओवैसी यांनी समाचार घेतला.

‘धार्मिक उन्माद घडवणारे हे बिल्किस बानो प्रकरणाचे खरे गुन्हेगार’

“गुजरातमध्ये दांडिया कार्यक्रमात दगडफेक केल्याचा आरोप करत भररस्त्यात खांबाला बांधून मुस्लीम मुलांना पोलिसांनी मारहाण केली. त्यावेळी उपस्थितांनी नारेबाजी केली, टाळ्या वाजवल्या. हीच आमच्या जिवाची किंमत आहे का? हाच आमचा आदर आहे का?” असा सवाल ओवैसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला. देशात अशा घटना होत असतील तर न्यायालयं बंद का करण्यात येत नाहीत, असा सवाल करतानाच त्यांनी पोलीस यंत्रणाही संपवून टाका, असे म्हटले आहे.

दरम्यान, ओवैसी यांनी आगामी निवडणुकीवरुनही भाजपावर हल्लाबोल केला आहे. “गुजरातच्या निवडणुकीत ओवैसींना मतदान करू नका, असे सर्व म्हणतील. मात्र तरीही देशात ज्यांच्यावर अत्याचार होतील, मी त्यांच्या सोबत असेल. मी गुन्हेगारांचा साथ देणार नाही”, असे ओवैसी म्हणाले आहेत. देशातील मदरसे जमीनदोस्त करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे