जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगमुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. एकट्या मे महिन्यात ४० नागरिक दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडले. दहशतवाद्यांनी दोन जणांची हत्या केल्यानंतर गुरुवारी ताजी प्रकरणे समोर आली. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हत्यासत्र सुरूच आहे. कुलगाममध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी एका बँक व्यवस्थापकाची हत्या केली. दहशतवाद्यांनी १ मेपासून काश्मीरमध्ये केलेली ही आठवी हत्या असून, या हत्यासत्राचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

विजयकुमार असे या बँक व्यवस्थापकाचे नाव आहे. ते कुलगाममधील इल्लाकी देहाती बँकचे आरेह मोहनपुरा शाखेचे व्यवस्थापक म्हणून काम करत होते.  विजयकुमार हे मूळचे राजस्थानचे असून, एका आठवडय़ापूर्वीच ते येथे सेवेत रुजू झाले होते. दहशतवाद्यांनी बँकेच्या शाखेत घुसून विजयकुमार यांच्यावर गोळीबार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले.  रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

परिस्थिती १९९० पेक्षाही भयनाक असल्याचं सांगत काश्मीर खोऱ्यातून सरकारी कर्मचारी, स्थानिकांचं मध्यरात्री पलायन

गेल्या महिन्याभरात दहशतवाद्यांनी आठ नागरिकांची हत्या केली असून, त्यापैकी तीन जण बिगरमुस्लीम सरकारी कर्मचारी होते. दोन दिवसांपूर्वीच कुलगाममध्येच दहशतवाद्यांनी रजनी बाला या शिक्षिकेची हत्या केली होती.  त्याआधी १२ मे रोजी बडगाम जिल्ह्यात छदुरा तहसील कार्यालयात राहुल भट या लिपिकाची दहशतवाद्यांनी हत्या केली होती.

भाजपा, काँग्रेसबरोबरच सर्वच राजकीय पक्षांनी या हत्यासत्राचा तीव्र निषेध केला आहे. काश्मीरमधील सुरक्षेची स्थिती गंभीर असल्याचे नमूद करत काँग्रेसने केंद्र सरकारला लक्ष्य केले. काश्मीरमधील नागरिकांना सुरक्षा पुरविण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला. तर महाराष्ट्रात मनसे या हल्ल्यानंतर आक्रमक झाली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारने हिंदूना स्वसंरक्षणासाठी बंदुकांचे परवाने द्यायला हवेत असे म्हटले आहे.

“ज्या पद्धतीने काश्मीर मध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत ते पाहता हिंदूंना सरकारने स्वसंरक्षणासाठी बंदुकांचे परवाने तसेच बंदुका आणि ते चालवण्याचे प्रशिक्षण केंद्र सरकारने दिले पाहिजे”, असे संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी नवी दिल्लीत जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत खोऱ्यातील सुरक्षा परिस्थितीबाबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात घडलेल्या दहशतवादी घटना, विशेषतः लक्ष्य हत्या आणि अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत गृह मंत्रालय, लष्कर आणि राज्य सुरक्षा यंत्रणांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत काश्मीर पंडितांच्या सुरक्षेबाबत आणि अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेबाबत मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात.