देशातील डॉक्टरांची सर्वात मोठी संस्था असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दाहिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करोनाचे ‘सुपर स्प्रेडर’ असल्याचं म्हटलं आहे. देशामध्ये करोनाची दुसरी लाट आली असताना राजकीय सभा घेणे तसेच कुंभमेळ्यासारख्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सहमती दर्शवल्याने करोनाचा मोठ्याप्रमाणात प्रसार झाल्याने डॉ. नवज्योत यांनी मोदींना सुपर स्प्रेडर म्हटल्याचं, द ट्रेब्युने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. सुपर स्प्रेडर म्हणजे अशी व्यक्ती जिच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना करोनाचा संसर्ग होतो.
“करोना विषाणूसंदर्भातील नियम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे यासाठी आरोग्य सेवेतील लोकं काम करत असतानाच दुसरीकडे पंतप्रधानांनी मोठ्या प्रचार सभांना संबोधित करण्यासंदर्भातील निर्णय घेताना मागे पुढे पाहिले नाही. त्यांनी करोनासंदर्भातील सर्व नियम मोडले,” असं डॉ. नवज्योत म्हणाले आहेत.




देशामध्ये करोनाचा पहिला रुग्ण जानेवारी २०२० मध्ये आढळून आला, असं सांगत डॉ. नवज्योत यांनी त्यावेळीही मोदींनी या विषयाकडे गांभीर्याने पाहिलं नाही असं म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार डॉ. नवज्योत यांनी, “देशातील पहिला रुग्ण जानेवारी २०२० मध्ये देशात आढळल्यानंतर मोदींनी यासंदर्भातील उपाययोजना करुन प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात काम करण्याऐवजी गुजरातमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांसाठी लाखो लोकांना एकत्र करुन सभा घेतली,” असं म्हटलं आहे.
नव्या संसदेचं बांधकाम ‘अत्यावश्यक सेवा’; मोदी सरकारच्या निर्णयामुळे लॉकडाउनदरम्यानही काम सुरुhttps://t.co/XoF7mHmvYn
१८० गाड्यांना कामगार, सामानाच्या वाहतुकीसाठी विशेष परवानगी दिलीय#CentralVista #CentralVistaProject #PMModi #Modi #Delhi #CoronavirusIndia #EssentialService— LoksattaLive (@LoksattaLive) April 28, 2021
“आता करोनाच्या दुसरी लाट अद्याप सर्वोच्च स्तरावर (पीकवर) पोहचलेली नसतानाही देशातील आरोग्य सेवा डळमळत असल्याचं चित्र दिसत असतानाही पंतप्रधानांनी मागील वर्षभरामध्ये आरोग्यसेवा मजबूत करण्यासंदर्भात काही निर्णय घेतल्याचं दिसून आलं नाही,” असंही डॉ. नवज्योत म्हणाले आहेत.
आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही पंतप्रधान मोदींवर टीका केली असून सध्याची देशातील कोरना परिस्थिती ही मोदींच्या नियोजनशून्य कारभाराचा परिणाम असल्याचं अनेक मोठ्या वृत्तपत्रांनी म्हटलं आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी रुग्ण दगावत असल्याचं डॉ. नवज्योत म्हणाले आहेत. “अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लॅण्ट उभारण्यासंदर्भातील होकार केंद्राने न दिल्याने प्रकल्प रडखले आहेत. मोदी सरकारने या गोष्टींना फार महत्व दिलं नाही,” अशी टीका नवज्योत यांनी केलीय.
पंतप्रधान मोदी हेच देशातील करोनाचे सुपर स्प्रेडरhttps://t.co/psely3FeEg < येथे वाचा सविस्तर वृत्त #CoronaVirus #CoronavirusIndia #PMModi #Elections pic.twitter.com/mvYAiEJkxI
— LoksattaLive (@LoksattaLive) April 28, 2021
देशातील अनेक शहरांमध्ये स्मशानभूमींबाहेर अंत्यविधीसाठी लागलेल्या रांगा या करोना परिस्थितीची दाहकता दर्शवणाऱ्या आहेत, असंही डॉ. नवज्योत म्हणाले आहेत. “शेतकरी आंदोलनासंदर्भातही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग्य ते निर्णय घेतले नाही. मोठ्या प्रमाणात आंदोलक शेतकऱ्यांना एकत्र येऊ दिलं. प्रश्न सोडवण्यापेक्षा आंदोलन होऊ दिलं आणि त्या माध्यमातून करोनाचा धोका वाढला,” असं डॉ. नवज्योत म्हणाले. बाबा राम देव यांच्या पतांजलीच्या औषधांना समर्थन देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावरही डॉ. नवज्योत यांनी टीका केली.